Sunday 9 November 2014

तुम्हाला हेच हवे आहे काय?

साधारण १०-१५ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. पुण्यातील एका नावाजलेल्या शाळेतील एका क्रीडा शिक्षकाला P. T. च्या तासाला मुलाला मारले म्हणून मुलाच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून काढून टाकले. ज्या मुलाला मारले तो मुलगा खोडकर आणि उद्धट म्हणूनच शाळेत आणि त्याच्या मित्रांमध्ये प्रसिद्ध होता. शिवाय बड्या आई-बापाचा लाडका. मग काय वर्गात त्याचेच प्रस्थ. कोणीही त्याच्या विरुद्ध काही बोलायची सोय नव्हती. शिक्षकही तसे जपूनच वागायचे त्याच्याशी. P. T. च्या तासाला त्या मुलाने बरोबरच्या एका मुलाच्या कानफटात मारली होती. ते शिक्षकांनी पाहिले आणि त्यांचा संताप अनावर होऊन त्यांनी त्या मुलाला मारले. झाले, त्या मुलाने घरी जाऊन आई-वडिलांना सांगितले. लगेच दुसर्या दिवशी आई-वडील तावातावाने शाळेत भांडायला आले व तक्रार केली. चौकशीअंती त्या क्रीडा शिक्षकाला नोकरीवरून कमी करण्यात आले. या सर्व घटनेत जशी शिक्षकाची चूक होती तशी त्या विद्यार्थ्याची नव्हती का? मग विद्यार्थ्याला काय शिक्षा मिळाली? यातून इतर विद्यार्थी व पालक यांना काय संदेश शाळेने व व्यवस्थेने दिला?

आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. जर आपल्या ओळखीत कोणी शिक्षक असतील तर त्यांना विचारा की कुठल्या दडपणाखाली त्यांना विद्यार्थ्यांना हाताळावे (नव्हे सांभाळावे) लागते ते! विद्यार्थ्यांवर जरा जरी हात उगारला किंवा ओरडले व विद्यार्थ्याने तक्रार केली तर त्यांना Atrocity or Child Abuse च्या कायद्याखाली अटक होऊ शकते व नोकरी जाते ते वेगळेच. आपण दुसर्या टोकाची पण उदाहरणे ऐकतो जिथे शिक्षकांची दहशत आहे व विद्यार्थी वा पालक काहीही करत नाही आहेत. ही दोन्ही टोके चूकच. 

प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना - विशेषतः शहरातील - शिस्त लावण्याचे काम खरे तर पालकांचे आहे; पण आजकालच्या पालकांना वेळच नाही; वेळ आहे तर इच्छा नाही असे दिसते. सर्वच पालक असे आहेत असे नाही पण प्रामुख्याने हीच परिस्थिती आहे. जिथे पालकच मुलांना शिस्त लावू शकत नाहीत, त्यांच्यापुढे योग्य आदर्श ठेऊ शकत नाहीत तिथे बिचारे शिक्षक काय करणार? 

माझा मुलगा ज्या शाळेत जातो त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी एका पालक सभेत असे सांगितले की मुला-मुलींना शाळेतले स्वच्छतागृह कसे वापरायचे याचे प्राथमिक ज्ञान सुद्धा नसते कारण घरी ते दिलेलेच नसते. त्यांनी सांगितलेली काही उदाहरणे ऐकून तिथे जमलेले आम्ही पालक नखशिखांत हादरून गेलो होतो व अंतर्मुख झालो होतो. देशातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची अतिशय दयनीय अवस्थ्या ही काही फक्त स्थानिक प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आलेली नाही तर तुमच्या-आमच्या सारखे नाकर्ते/बेशरम नागरिकही त्याला तितकेच जबाबदार आहेत. 

कॉलेजमध्ये तर याहीपेक्षा भयानक परिस्थिती आहे. उदासीन प्राध्यापक, बेजबाबदार/स्वतःतच मग्न असणारे विद्यार्थी आणि कॉलेजचे बेपर्वा प्रशासन यामुळे एकूणच शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. परत तिथे विद्यार्थ्यांना बोलायची सोय नाही कारण तसे केले तर विद्यार्थी संघटना येउन चोप देण्याची भीती. महाविद्यालयीन विद्यार्थी दिवसभर काय करतात, कुठे जातात, कोणाच्या संगतीत असतात हे आई-वडिलांना माहितीच नसते. आणि मग अचानक एक दिवस आपल्या मुला-मुलीचे नाव रेव्ह पार्टीत आलेले बघून पालक हादरून जातात तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. 

दुसरी घटना - काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने डान्स-बार बंद करायची घोषणा केली अन काय कहर माजला विशेषतः मुंबईमध्ये. सर्व बारबाला सरकारविरुद्ध रस्त्यावर आल्या; त्यांचे नेते सरकारला कोर्टात खेचायची भाषा करु लागले; कारण काय तर बारबालांच्या आर्थिक कमाईचा स्रोत बंद झाला! महाराष्ट्रातील महिलांना या मार्गाने का जावे लागते, त्याला पर्याय काय याचा पुरेसा विचार न करता डान्स-बार चालू ठेवावेत ही मागणी कितपत योग्य आहे? प्रत्येक नागरिकाला योग्य ते काम देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे हे मान्य; पण म्हणून जो व्यवसाय नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे आणि स्त्रियांवरही अन्यायकारक आहे तो बंद करताच इथल्या "विचारवंतानी" व माध्यमांनी केलेला गहजब आपण कुठे चाललो आहोत याची चिंता करायला लावतो. 

आजकाल आजूबाजूला बघितले तर काय दिसते? जागोजागी स्वतःच्या स्वार्थासाठी नियम मोडणारा, लाच देणारा/घेणारा, बेकायदेशीर घरे बांधणारा आणि ती घरे विकत घेणारा व महापालिका ती घरे तोडायला आल्यावर त्यांच्यावर दगडफेक करणारा, बेहिशोबी अगणित पैसा गोळा करणारा, आयकर चुकवण्यासाठी कुठल्याही थराला जाणारा सुशिक्षित / अशिक्षित समाज आणि हे सर्व करणार्यांकडे त्रयस्थपणे बघत गप्प बसणारे तुमच्या आमच्या सारखे लोक. आम्हाला काही करायला नको म्हणून मोदी-फडणवीस सारख्यांना निवडून द्यायचे आणि त्यांच्या चांगल्या/वाईट कारभाराचे वाभाडे वैशालीत बसून चहा पिताना काढायचे. मी असे म्हणत नाही की सर्वच लोक वाईट आहेत पण चांगले गप्प बसतात म्हणून वाईट लोकांचे फावते. आपल्याला हेच हवे आहे काय?

हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे Kiss of Love या तथाकथित आंदोलनावरून उठलेला गदारोळ. कोचीमधल्या एका हॉटेल मध्ये एका मुलाने मुलीचे चुंबन घेतले म्हणून तिथे असलेल्या काही मंडळीनी हॉटेलची तोडफोड केली. त्याची प्रतिक्रिया म्हणून हे आंदोलन सुरु झाले; त्याला समाजातील तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्यवादी लोकांनी व माध्यमांनी खतपाणी घातले व Kiss of Love च्या विरोधकांना झोडपण्यास सुरुवात केली. एखादी घटना पटली नाही म्हणून तोडफोड करणे जसे निषेधार्ह आहे तितकेच निषेधार्ह त्या घटनेचे व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली समर्थन करणेही आहे. 

एका व्यक्तीने आपल्या आवडत्या व्यक्तीचे चुंबन घेणे यात वाईट काही नाही; पण हा त्या दोघांमधील वैयक्तिक विषय नाही का? वैयक्तिक संबंधाचे जाहीर प्रदर्शन करण्यामागे कुठली वृत्ती वा कारणे आहेत? आणि कोणी त्याला विरोध केला तर त्याला प्रतिगामी ठरवून अशा घटनांना उत्तेजन देणारे नेमके काय साधू इच्छितात? उद्या असेच होत राहिले तर संभोग ही सुद्धा जाहीरपणे करायची गोष्ट होईल, ती आपल्याला चालेल का? कुठल्याही समाजात नीतीमत्तेचे काही अलिखित नियम असतात; ते त्या देशाच्या, समाजाच्या तत्कालीन सामाजिक जाणिवांप्रमाणे ठरलेले असतात; त्यात बदलही होत असतात/व्हायला हवेत; पण असे करताना एकूण समाजावर विशेषतः तरुण पिढीवर त्या बदलांचा होणारा बरा/वाईट परिणाम याचा विचार करून ते बदल स्वीकारायचे असतात. 

व्यक्तिस्वातंत्र्याचे स्वैराचारात रुपांतर झाले की काय होते ते सध्याच्या अमेरिकेतील समाज जीवनाकडे बघितल्यावर लक्षात येते. नवरा-बायकोंमधील नातेसंबंध, आई-वडील आणि मुलगा/मुलगी यांच्यातील संबंध हे पूर्णतः दुरावलेले दिसतात, कुमारी-मातांच्या प्रश्नाने भयानक रूप धारण केलेले दिसते, कुटुंब नावाची संस्थाच नाहीशी झालेली दिसते. मग नैराश्याने ग्रासलेले तरुण-तरुणी आत्महत्या करतात, नवरा-बायको घटस्फोट घेतात, शाळेतील कुमारवयीन मुले गोळीबार करतात. अमेरिकेतील सुख समृद्धी अशा उधवस्त माणसांना मनःशांती देऊ शकत नाही; मग हीच माणसे भारतीय योग शिकताना दिसतात; आपण सर्व जण Times Square मधील योगासन  वर्गांची दृश्ये बघतो आणि मनोमन सुखावतो की नाही? 

पण मित्रांनो, आपल्याकडे मोठ्या शहरांमध्ये हीच परिस्थिती हळूहळू निर्माण होते आहे; गेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे, अनैतिक संबंधांना जणू काही समाजमान्यता मिळत आहे कारण टी. व्ही. वरील एकही मालिका (काही सन्माननीय अपवाद वगळता) अनैतिक संबंधांशिवाय पूर्णच होत नाही, मुला-मुलींमध्ये सिगारेट, दारू सारखी व्यसने वाढीस लागत आहेत, मधूनच एखादी रेव्ह-पार्टी पकडली जाते व आपण अस्वस्थ होतो; पण कुणास ठाऊक अशा अनेक रेव्ह-पार्ट्या होत असतील, डिस्को-पबमध्ये जे प्रकार चालतात ते आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहेत; अनेक नोकरदार शुक्रवार संध्याकाळी "बसतात" आणि एखादा पिणारा नसेल तर त्याची चेष्टाही होते, अनेक सोसायट्यांमध्ये शनिवार-रविवार घरी स्वयंपाकाच होत नाही; आमच्या जवळील एका सोसायटीत तर भरल्या घरात दोन्ही वेळेस जेवणाचे डबे बाहेरून येतात व वीक-एंडला बाहेर जेवतात; मुलांनी आईच्या हाताची चव कधी बघितलेलीच नाही. 

तुम्ही याकडे कसे बघता? याचा कुठल्या तरी पातळीवर नैतिक पद्धतीने विरोध वा निषेध करता का? का तुमच्या घरापर्यंत ही कीड यायची वाट बघत आहात? तुम्हाला हेच हवे आहे काय? 

मित्रांनो, याचा जरूर विचार करा. व जिथे जिथे माध्यमे व तथाकथित व्यक्तीस्वातंत्र्यवादी व विचारवंतांकडून या प्रकारांना उत्तेजन दिले जाते तिथे तिथे  प्रतिगामी म्हणून हिणवले जाण्याची तमा न बाळगता त्याचा विरोध / निषेध करा. नाहीतर किल्ला ढासळत जाईल आणि तुम्ही फक्त प्रेक्षक असाल!

कोणीतरी म्हटले होते की देशातल्या तरुणांच्या ओठांवर कुठली गाणी आहेत त्यावरून त्या देशाचे/समाजाचे भविष्य ठरत असते! वेडेच होते ते - स्वातंत्र्यापूर्वीचे?



Friday 3 October 2014

मोदीजी - तुम्हारा चुक्याच!

[भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अनावृत्त पत्र]

==============================


प्रिय प्रधानमंत्री मोदीसाहेब, 

अहो काय हे? आमचा पुरता भ्रमनिरास केलात की हो तुम्ही! तुमची लोकसभा निवडणुकीच्या वेळची भाषणे आम्ही खूपच मन लावून ऐकायचो, विशेषतः तुमचे ते 'अच्छे दिन आयेंगे' आम्हाला भारी आवडायचे. आम्हाला वाटायचे की जसे तुमच्या पक्षात सत्तेचे कमळ फुलले तसे आमच्याही जीवनात सुख, समृद्धी, आराम आणि शांततेचे कमळ फुलेल. तुम्ही जेंव्हा "सबका साथ, सबका विकास" म्हणायचात तेंव्हा आम्हाला वाटायचे की तुम्ही सर्व विरोधकांना बरोबर घेऊन आमचा विकास करणार. परवा १५ ऑगस्टला पण तुम्ही लाल किल्यावरुन केलेल्या भाषणात "मी जनतेचा प्रधान सेवक आहे" असे म्हणालात, त्यामुळे आम्ही जाम म्हणजे जामच खूष झालो होतो. 

पण परवा २ ऑक्टोबरला तुम्ही जेंव्हा स्वच्छता अभियानाची सुरुवात केलीत तेव्हा कुठे आम्हाला कळले तुम्हाला अभिप्रेत असलेल्या "सबका साथ" मध्ये आम्ही पण आलो म्हणून; आणि आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला. तुम्ही राव आमच्या long week end ची मजाच घालवलीत, हे काही बरे नाही, अगदीच असह्य झाले म्हणून हा पत्र प्रपंच. 


कित्ती कित्ती plans केले होते आम्ही ही सुट्टी आणि थोड्याच दिवसात येणारी दिवाळीची मोठी सुट्टी enjoy करण्याचे. पण आत्ता तुम्ही जणू फर्मानच काढले आहे की प्रत्येकाने वर्षाचे १०० तास म्हणजे एका आठवड्याचे २ तास स्वच्छतेला द्यायचे म्हणून! अहो, तुम्हाला काय माहिती की आम्हाला इथे xxवायला सुद्धा वेळ नसतो. तुमचे एक बरे आहे, तुम्ही पडलात अविवाहित (कागदावर नव्हे पण प्रत्यक्षात), तुम्हाला ना बायकोचा त्रास ना मुला-बाळांचा. आमचे तसे नाही, आम्ही जरी सरकारी कर्मचारी असलो तरी ऑफिसमध्ये आमचे काम सोडून आम्ही किती महत्वाची कामे करत असतो उ. दा. लोकांचे ग्रुप्स जमवून गप्पा झोडणे, त्यांना फुकटचे सल्ले देणे - कुठे investment करायची आणि कुठे नाही, दोनाचे-चार आणि चाराचे-आठ कसे करायचे, याशिवाय ऑफिसमधल्या साहेबाची लफडी, इतरांचे आतले आणि बाहेरचे उद्योग, week end destination कुठले छान आहे, गटारीचे plans, वगैरे वगैरे. शिवाय जर एक-दोन दिवस रजा घेतली की टेबलावर अशी धूळ साठते की ती आमची आम्हालाच झटकायला लागते (आमचे चतुर्थ श्रेणीतले सफाई कर्मचारी आमच्याकडे सह्या मारून शेजारच्या दुकानात कामाला जातात). या सगळ्यात आमचे ८ तास कसे जातात कळतसुद्धा नाही. मग दमून-भागून ६/६:३० ला घरी आल्यावर बायकोच्या हातचा गरम गरम चहा पिऊन जरा शीण घालवायचा, टी. व्ही. वर बातम्या, मनोरंजनाचे कार्यक्रम बघून होईपर्यंत १० वाजतात. त्यापुढे वेळ राहिला व उत्साह वाटला तर मुलांची थोडी फार चौकशी करायची. म्हणजे किती busy routine असते बघा. तरी शनिवार-रविवार सुट्टी असते म्हणून family साठी जरा तरी वेळ देता येतो, बायको-मुलांना घेऊन कधी E-Square मध्ये सिनेमाला जा, कधी मॉल मध्ये खरेदीला जा, तर कधी एखादा week end गाडी काढून picnic ला जा, भरमसाठ कामे हो! आता सांगा या सगळ्या आवश्यक कामांमधून देशाची स्वच्छता करायला वेळ होईल का? तुमचे आपले काहीतरीच!

हे दुःख आमचेच नव्हे तर आमच्या समस्त मित्रांचेही आहे. आमचा मित्र-परिवार खूप मोठा आहे, त्यात वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट, इंजिनीअर, लेखापाल, व्यावसायिक, प्राध्यापक, बँकेचे कर्मचारी, IT वाले,  लेखक, पत्रकार, नाटक-सिनेमावाले, माध्यम-तज्ञ, इ. बरेच आहेत. 

आता वकिलांचेच घ्या ना, किती कष्ट करतात बिचारे होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करायला. ह्याचे वकीलपत्र घ्यावे तर दुसरा मारण्याची भीती; अशा दबावाखाली काम करण्याचे वेगळे पैसे सुद्धा मिळत नाहीत. भर उन्हाळ्यात काळा डगला घालून घामाघूम होत काम करायचे म्हणजे काय चेष्टा आहे? अशिलांचा दबाव असतो तो वेगळाच. मजबुरी का नाम वकील असे म्हणायची वेळ आली आहे. पोटासाठी काय काय करावे लागते तुम्हाला कल्पना नाही. अशा परिस्थितीतून त्यांनी कसे २ तास द्यायचे दर आठवड्याला?

आमचे एक लेखक मित्र आहेत. कधी नाटके तर कधी टी. व्ही. सिरीअल्स, कधी सिनेमा लेखन तर कधी वर्तमानपत्रातून तिरक्या रेघा मारत असतात. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांमध्येच "सं. प." असल्याने ते वरील गोष्टींव्यतिरिक्त कधीच काही करत नाहीत. त्यांचे समविचारी लेखक-पत्रकार मित्रांचे टोळकेही तसेच आहे. या लोकांना भारतात काही चांगले चालले आहे असे मुळी वाटतच नाही. यांचा बराचसा वेळ विरोधकांची उणीदुणी काढण्यात जातो. बरं, हे स्वतः काही करणार नाहीत, दुसर्याला उपदेश देणार - कधी फुले जयंतीला तर कधी आंबेडकर जयंतीला. आजकाल २० ऑगस्टला पुण्यातील बालगंधर्व पुलावर जमून निदर्शने करतात. एवढ्या सगळ्या व्यापातून तुमच्या अभियानामागची भूमिका समजून घ्यायला वेळ कुठे आहे? आणि कळली तरी मान्य कसे करणार? अशा संभ्रमावस्थेतून ते मग स्वच्छता करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. 

आमचे डॉक्टर मित्र तर already वैतागलेत! अहो आजकाल जो उठतो तो यांच्याकडे संशयाने बघतो. कोणी म्हणतो Cut Practice करतात, कोणी म्हणतो यांचे racket आहे. आजकालची परिस्थितीच अशी आहे की खाजगी practice चालतच नाही, मग कधी या हॉस्पिटलला तर कधी त्या, धावून धावून जीव दमून जातो. बर गेली ३० वर्षे practice करत आहेत, भरपूर पैसा गाठीशी आहे, म्हटले तर सर्व सुखे हात जोडून दाराशी उभी आहेत, तरी सुद्धा अजून धावपळ चालूच आहे. सकाळी ५ ते रात्री १२ असे रुटीन चालू आहे. का करतोय हे सगळे एवढा विचार करायला सुद्धा फुरसत नाही तिथे स्वच्छता अभियानाला काय डोंबल वेळ देणार हे? 

आमच्या ग्रुप मधला सर्वात तरुण म्हणजे साधारण ३५-४० वयोगटातला मित्र म्हणजे IT वाला. १८ वर्षे नोकरी करतो आहे, एव्हाना ५-६ कंपन्या बदलून झाल्या आहेत. वर्षातून किमान दोनदा तरी परदेश दौरे असतात. यांना आधीच लठ्ठ पगार, त्यात परदेश दौरा करून आले की आणखी कमाई. कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत. उच्चभ्रू वस्तीत ३-BHK घर आहे, दाराशी Honda latest model ची गाडी आहे, सुंदर संसार आहे. २ गोंडस मुले आहेत, शिवाय बायकोला पण चांगली नोकरी आहे. "हम दो हमारे दो" एवढेच यांचे जग आहे. महिन्यातून दोनदा गाडी काढायची आणि सुटायचे - कधी कोकणात तर कधी गोव्याला. तेवढाच जरा चेंज!  पण यांचा Work-Life Balance झीरो झालाय म्हणून सारखे रडत असतात. कामाच्या वेळा अतिशय odd झाल्यात, जायची वेळ सांगता येते पण परत यायची वेळ नाही; बर्याच वेळा तर घरीच काम घेऊन यावे लागते, week end ला सुद्धा घरून काम करावे लागते. तरी बरे हाताशी Smart Phone असल्याने सारखे फेसबुक, ट्विटर किंवा WhatsApp वरून नातेवाईक-मित्र यांच्या संपर्कात राहता येते नाहीतर अवघडच होते. संदीप खरे यांची "दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई" ही कविता यांच्यावरच लिहिली असावी अशी शंका येते. या अशा सदैव busy माणसांना कुठला आलाय देशासाठी वेळ? अहो ते परदेशी ग्राहकांसाठी काम करून डॉलर आणतात हीच केवढी मोठी देशभक्ती यांची! त्यांना तुम्ही स्वच्छता वगैरे करायला लावू नका बुवा. 

ते बघा, ते दिसतायत ना ते आहेत आमच्या येथील एका उच्च कॉलेजमधील तरुण-तरुणी. काय म्हणता शरीरयष्टीवरून शाळेतले वाटतात? अहो आजकाल शरीरयष्टी नाही तर Style बघायची असते. कित्ती मेहनत लागते Style develop करायला, Parlor मध्ये तासनतास बसावे लागते मनासारखी Hair Style किंवा Facial करून घ्यायला. अधून मधून सारखे मॉल मध्ये जाऊन Latest Fashion चा study करायला लागतो, नाहीतर ग्रुप मध्ये टिंगल होते ना. शिवाय आई-बाबांच्या मागे लागून latest smart phone आणि टू-व्हीलर पण घ्यावी लागते. Parents ना पटवायचे म्हणजे सर्वात difficult आहे. त्यांचे मूड्स बघायचे, ते किती बिझी आहेत याचा अंदाज घ्यायचा आणि बरोबर वेळ साधायची. हे म्हणजे काय Pizza खाण्याइतके सोपे काम आहे का? या सगळ्यातून वेळ झालाच तर कॉलेजला जायचे. एक वेळ तिकडे गेले नाही तरी चालते पण क्लास मात्र अटेंड करावाच लागतो, भरपूर पैसे भरले आहेत ना तिथे! तर या सगळ्या Up-to-date राहण्याच्या गडबडीतून या पोरांना देशाच्या स्वच्छतेसाठी वेळ कुठून मिळणार? अहो यांच्या आई-वडिलांनाच पोरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे यांची काय कथा? 

तेव्हा मोदीजी, बघा बुवा, परत एकदा विचार करा तुमच्या महत्वाकांक्षी योजनेचा. आम्ही आपले तुम्हाला घर बसल्या Risks highlight करण्याचे मोठे काम केले आहे, ही सुद्धा एक प्रकारची देशभक्तीच नाही का? :-)

आपला घरबसू देशभक्त,
आ. ग. लावे

Saturday 20 September 2014

वसुंधरेवरील तारे - डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी

डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी
डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी
पुण्याजवळ अवघ्या ३५-४० कि.मी. वर असलेले भोर हे तालुक्याचे ठिकाण. भोरच्या बस स्थानकाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने बाजारपेठेतून भोरेश्वराच्या मंदिराकडे जाणारा रस्ता. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याआधी तुमचे मन शांत करावे व तुम्हाला प्रसन्न/पवित्र वाटावे म्हणूनच जणू काही परमेश्वराने त्याच रस्त्यावर मंदिराच्या थोडे आधी डॉ. प्रभाकर जोशी यांच्या घराची व्यवस्था केली असावी, असे मला कायम वाटत आले आहे.

डॉक्टरांच्या बैठ्या घरात शिरल्या शिरल्या प्रसन्न वाटावे असेच वातावरण. बैठकीची खोली, स्वयंपाकघर आणि शेजारच्या खोलीत दवाखाना अशी घराची मांडणी. सर्वत्र अत्यंत अकृत्रिम असा साधेपणा. बैठकीच्या खोलीतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले ३ सरसंघचालक - डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस - यांचे एकत्रित चित्र हे डॉक्टरांच्या निष्ठा आणि आदर्श दर्शविते. डॉक्टरांच्या डोक्यावरची पांढरी टोपी पाहिली की साने गुरुजींचाही प्रभाव त्यांच्यावर पडला आहे हे जाणवते. 

डॉक्टरांची, ती. सौ. काकूंची (पूर्वाश्रमीच्या विमल रानडे - त्याही स्वतः डॉक्टर, Gynaecologist) आणि त्यांचा मुलगा डॉ. उदय या सर्वांची गाठ पडली की आपल्याला जणू काही सात्विकतेचा नव्याने परिचय होतो. 

गेली ३० वर्षे डॉक्टरांची ओळख समस्त भोर तालुक्याला आहे ती त्यांनी १९८३ साली भोरपासून २० कि. मी. अंतरावर असलेल्या रावडी गावात सुरु केलेल्या आणि आजतागायत अतिशय नेटाने चालवलेल्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके शाळेमुळे.

डॉक्टरांचे जन्मगाव रावडी. रायरेश्वर जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली होती त्याच्या पायथ्याशी असलेले रावडी गाव. चहुबाजूनी भात शेतीने वेढलेले निसर्गसुंदर असे रावडी गाव. तिथे शिक्षणाची काहीच सोय नसल्याने डॉक्टरांना वाई, असवली इ. मोठ्या गावांमध्ये जाऊन शिक्षण घ्यायला लागले. त्यामुळे डॉक्टरांनी लहानपणापासूनच ठरवले की आपल्याला ज्या अडचणीतून शिक्षण घ्यायला लागले ती अडचण आपल्या गावातील आणि आसपासच्या मुलांना येऊ नये म्हणून आपण गावामध्ये शाळा काढायची.

वयाच्या सातव्या वर्षी डॉक्टरांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी ठरवले की आयुष्यात काही तरी केले पाहिजे. १० वी पर्यंतचे शिक्षण वाई, असवली येथे पूर्ण केल्यानंतर ११ वी / १२ वी चे शिक्षण पुण्यात स. प. महाविद्यालयात झाले. पुण्यात असताना घरोघरी दूध घालून अभ्यास केला. स. प. महाविद्यालयात शिकत असताना डॉ. दि. ब. केरूर यांचे अर्थशास्त्र आणि पु. ग. सहस्रबुद्धे सरांचे मराठी विषयात मार्गदर्शन मिळाले. पुण्याने डॉक्टरांना खूप काही दिले त्यामुळे आजही ते पुण्याचे ऋण मान्य करतात. १२ जुलै १९६१ ला ज्या दिवशी पुण्यात पूर आला होता त्या दिवशी डॉक्टर नेहमीप्रमाणे दूध घालत असताना अप्पा बळवंत चौकात अडकून पडले होते याची आठवण अजूनही ताजी आहे. नातुबागेमध्ये एक खोली घेऊन डॉक्टर राहायचे आणि स्वतःचा स्वयंपाक स्वतःच करायचे. मुळात वाचनाची आवड असलेल्या डॉक्टरांना संशोधनपर आणि ऐतिहासिक लिखाण वाचायला आवडते.

नंतर वैद्यकीय शाखेत डॉक्टरांना प्रवेश मिळाला पण त्यासाठी पुणे सोडून अकोला इथे जायला लागले. डॉक्टर होऊन समाजाची सेवा करावी ही त्यांची प्रथमपासूनची इच्छा होती. त्याप्रमाणे अकोला येथे ५ वर्षे वैद्यकीय शिक्षण घेतले. या काळात त्यांना आपटे व वझे या संघ कार्यकर्त्यांची खूप मदत झाली. त्यांच्यामुळे संघाच्या कार्यालयात राहायची व आपटे यांच्या खानावळीत जेवणाची मोफत सोय झाली.

डॉक्टरांचा संघाशी संपर्क त्यांच्या काकांमुळे लहानपणापासूनच आला. पुढे शिक्षणाच्या दरम्यान डॉक्टर एक वर्ष विदर्भात मूर्तिजापूर इथे संघाचे प्रचारक म्हणून गेले होते. गेली अनेक वर्षांपासून डॉक्टरांकडे भोर तालुका संघचालक जबाबदारी आहे.

सुरुवातीची शाळा
१९७० च्या सुमारास वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर परत भोरला आले व इथे वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली. त्याच सुमारास डॉक्टरांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी "सरस्वती प्रतिष्ठान" संस्था काढली. प्रत्यक्ष शाळा सुरु व्हायला १९८३ साल उजाडावे लागले. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १०० व्या पुण्यतिथीचे निमित्त साधून १७ फेब्रुवारी १९८३ रोजी चिखलगाव येथे २ शिक्षक आणि २० मुले यांना घेऊन शाळा सुरु झाली. १९८३ ते १९९३ ही १० वर्षे चिखलगाव येथील देवळामध्ये शाळा भरायची.

सुरुवातीचे दिवस अतिशय कठीण होते. विशेषतः आर्थिक बाजू. शाळेला शासकीय परवानगी तर मिळाली होती पण अनुदान मिळाले नव्हते. अशा परिस्थितीत जोशी कुटुंबियांनी स्वतःच्या खिशातील पैशातून शाळेतील शिक्षकांचे पगार व इतर खर्च भागवले. 
रावडी येथील जोशी परिवाराच्या जागेत शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
सुरुवातीच्या काळात उच्च शिक्षित असलेले श्री. रवि आचार्य सर, प्रभुदेसाई सर, नीलाताई पाठारे बाई, माधवराव देशपांडे सर असे अनेक निष्ठावान सहकारी डॉक्टरांना मिळाले. मुलांना शाळेची गोडी लागावी म्हणून हे शिक्षक मुलांबरोबर क्रिकेट खेळायचे व मग शाळा भरवायचे. २० विद्यार्थ्यांना घेऊन सुरु झालेली शाळा हळू हळू वाढू लागली. मग शाळेला जागा कमी पडायला लागली म्हणून जोशी कुटुंबियांनी रावडी येथील स्वतःची २ एकर जमीन शाळेला दिली. श्री. अरुण किर्लोस्करांनी शाळेला भरघोस मदत केल्याने रावडीला शाळेची इमारत १९९३ साली उभी राहिली.

सध्याची शाळा  
पण रायरेश्वराच्या पठारावरून ५-६ कि. मी. चालून शाळेला येणार्या विद्यार्थ्यांच्या अडचणी डॉक्टरांनी ओळखल्या व त्यांच्यासाठी वसतिगृह बांधायचे ठरवले. सातारा येथील एका संस्थेने दिलेल्या मदतीमुळे वसतिगृहाची इमारत २००० साली उभी राहिली. आज या वसतीगृहात ६० मुले विनामूल्य राहतात.

शाळेचे चांगले काम पाहून अनेक लोकांनी मदत केली. श्री. प्रकाश जावडेकर यांच्या आमदार निधीतून विज्ञान प्रयोगशाळा उभी राहिली. Cognizant Foundation ने केलेल्या मदतीमधून २००६-०७ पासून Computer Laboratory चालू झाली. शाळेत शिकलेल्या एका गरीब घरातील मुलाने वडिलांना मदत करून मिळालेल्या पैशातून शाळेला रु. १०,०००/- देणगी दिली.

आज रोजी शाळेत साधारण ४०० विद्यार्थी ५ वी ते १० वी मध्ये शिक्षण घेत आहेत. पूर्ण वेळ शिक्षकांची संख्याही १७ आहे. आर्थिकदृष्ट्या गरीब घरातील मुलांना शाळा अतिशय कमी पैशात शिक्षण देते.

गेल्या ३० वर्षात शाळेतील मुलांनी उल्लेखनीय यश मिळवलेले आहे. लीना ओव्हाळ ही मुलगी शाळेतून शिकून आता शासकीय सेवेत कलेक्टर पदावर काम करत आहे. २०१३ साली गणेश हासपे वर्धा येथील राष्ट्रभाषा प्रचार सभेने घेतलेल्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम आला. अनेक विद्यार्थ्यांना राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळाली आहे. शाळेतील सर्व मुलांना भगवद्गीता म्हणता येते. या कारणास्तव २००६ साली गीता धर्म मंडळाने शाळेला आत्माराम करंडक दिला.

समाजाची सेवा करावी या भावनेबरोबरच समाजासाठी प्रचंड काम केलेल्या कार्यकर्त्यांविषयी कृतज्ञता भाव हा डॉक्टरांचा मोठा गुण आहे. या भावनेतूनच सुरुवातीला असलेले संस्थेचे "सरस्वती प्रतिष्ठान" हया नावाला "दधिचींना प्रणाम" हे नाव जोडले. दधिची ऋषींनी स्वतःच्या अस्थी देवांच्या चांगल्या कामासाठी दिल्या होत्या तसेच समाजातील आधुनिक दधिचींविषयी कृतज्ञता म्हणून "सरस्वती प्रतिष्ठान दधिचींना प्रणाम" असे थोडेसे मोठे व जरासे विचित्र नाव आग्रहपूर्वक संस्थेला दिले. नावात बदल करताना पुण्यातील धर्मादाय आयुक्तांनी आक्षेप घेतले; तेंव्हा दधिची कोण हे सर्व त्यांना समजावून सांगायला लागले.

मा. श्री. मोहनजी रानडे शाळेतील एका कार्यक्रमात 
याच कामाचा एक भाग म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना डॉक्टरांनी मदतीचा हात दिला आहे. मग ते प्रमोद दीक्षित जे आसाममधे काम करताना दहशतवाद्यांकडून मारले गेले त्यांच्या नावाने शाळेत लावलेले झाड असो, किंवा गोवा मुक्ती संग्रामातील सेनानी श्री. मोहनजी रानडे यांचा शाळेत बोलावून केलेला सत्कार असो. १४ जानेवारी हा पानिपत युद्धाचा स्मरण दिवस. या दिवसाची आठवण राहावी म्हणून पेशव्यांची देवी ही मुरुड येथील दुर्गा देवी - तिला दर वर्षी १४ जानेवारीला अभिषेक चालू केला.


आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा अस्थिकलश एडनवरून शाळेत आणला 
वासुदेव बळवंत यांची आठवण म्हणून त्यांनी ज्या एडनच्या कारागृहात मरण यातना भोगून प्राण सोडले त्या ठिकाणची माती आणून तो कलश आज शाळेत ठेवला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना वासुदेव बळवंतांच्या त्यागाची जाणीव कायम राहावी. पुण्यातील CID विभागात जेंव्हा त्यांचा पुतळा बसवला होता त्या वेळेस त्या विभागाकडून शाळेला आवर्जून बोलावणे आले, त्याप्रमाणे शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्या कार्यक्रमात "गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार" हे गीत सादर केले.

भोर येथील वनवासी कल्याण आश्रमाचे काम डॉक्टरांच्या घरात सुरु झाले. आता आश्रमाची स्वतःची जागा आहे.

डॉक्टर स्वतः अतिशय कमी बोलतात आणि त्यांना जे म्हणायचे आहे ते कृतीतून दाखवतात. उ.दा. डॉक्टरांनी भोरेश्वर मंदिरात सनई वादनाची सुरुवात १९७९ साली केली. तेंव्हापासून भोर गावाची मंगल सुरुवात सकाळी ५:३० वाजता भोरेश्वराच्या सनई वादनाने होते. तशीच सनई डॉक्टरांनी रायरेश्वर आणि वाई येथे सुरु केली. आणि आता आंबेघर येथील प्राचीन शिवकालीन मंदिरात सनई सुरु करण्याचा मानस आहे.

शाळेच्या भावी योजनांमध्ये महाविद्यालय सुरु करायचे डॉक्टरांच्या मनात आहे; आवश्यक ती परवानगी मिळाली आहे. पुरेसे शिक्षक व विद्यार्थी मिळाले तर ते सुरु होईल. तरीही डॉक्टर व त्यांचे सर्व सहकारी धीर न सोडता काम करत आहेत.

तर असे हे आपले डॉक्टर जोशी, अतिशय निगर्वी, शांत आणि कृतज्ञ स्वभावाचे डॉक्टर. वैद्यकीय व्यवसाय करून प्रचंड पैसा मिळवण्याच्या सर्व संधी झुगारून देऊन स्वतःच्या गावात वैद्यकीय सेवा देतात, गावातील मुलांसाठी शाळा चालवतात, या सर्वांमधे त्यांच्या सुविद्य पत्नीची आणि मुलाची तितकीच तोलामोलाची साथ त्यांना लाभते. आणि तरीही प्रसिद्धीचे वारेही त्यांना शिवत नाही. कुठल्याही वर्तमानपत्रात, मासिकात किंवा दूरदर्शन माध्यमांमध्ये त्यांच्याबद्दल, त्यांच्या कामाबद्दल काहीही लिहून येत नाही. ही आपल्या माध्यमांमध्ये आणि विचारवंतांमध्ये असलेली वैचारिक अस्पृश्यातच दाखवते.

भोर गावामध्ये एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे उभे असलेले डॉक्टर, वयाच्या मर्यादेमुळे हालचालींवर मर्यादा आल्या तरी विचारांवर नाही आणि त्यातूनच नवनवीन योजना सहकार्यांच्या मदतीने राबवत असतात. त्यांचे उभे जीवन हे आपल्यासारख्यांसाठी एक आदर्शच आहे. आणि म्हणूनच ते आहेत या वसुंधरेवरील तारे. त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ या.

[संपर्कासाठी पत्ता - डॉ. प्रभाकर चिंतामण जोशी, मंगळवार पेठ, राजवाडा रस्ता, भोर ४१२ ०२६. दूरध्वनी क्र. +91 2113 222720, ई-मेल: joshibhor@yahoo.com]

Sunday 13 July 2014

Don't Thank God, I am in minority!

Non-Disclaimer: The views expressed here are completely of my own. It is not intended to hurt any particular community. The word "I" used here represents not just myself but all those who follow all the good things that have been mentioned below. It is not at all obligatory for the readers to follow any of these.

It was a pleasant Sunday morning, the road just outside my house was mostly empty, an empty road is a rare phenomenon for a normal working day, but not for a Sunday. I was driving at usual speed when I came across a Red signal and as always I stopped waiting for it to turn Green. And then I saw few vehicles passing by me jumping the Red signal. They didn't care to look around nor they seemed to be bothered much. They were only interested in reaching their goal ahead of time; they would not have hesitated to drive the wrong way, honking unnecessarily and discomforting others who were following the discipline. I was a in a minority then.

But I prayed to the Almighty to bestow a lot of common sense in many of us that would inspire them to follow the traffic rules. And perhaps we will soon see अच्छे दिन for the Pune traffic.

Last year, during summer vacations, we were traveling to Mumbai by train. It was a Friday evening; the train was over-crowded, passengers were standing in a reserved bogie, the vendors were making round trips to sell their food items. Overall, it was a very noisy atmosphere. Soon we reached Lonavala and Vada-Paav vaalas barged into the bogie. The Vada-Paav was followed by Tea-Coffee vendors. After a nice round of snacks, many of the passengers kept the garbage under their seats; while few started throwing it outside the window. And these were so-called educated cultured citizens from the Metros.

Normally we carry our own bags to keep the garbage that we produce during the journey and throw it in the dustbins at the station. I wondered why these people could not do it. We started talking to few of them but to our disbelief we were greeted by bad words followed by a kind advice of minding our own business. Alas, we were in minority once again.

In 2012, I had to renew my passport and I was not getting time due to extremely hectic schedule at office. Many of the friends advised me to approach an Agent as it would have saved my time and frustration. All it would have taken is proper preparation for the passport appointment and reserving about 6-8 hours of time if planned in advance. Can't we do it ourselves?

Same scene goes for getting a Driving license, Ration Card, Railway bookings, etc. Why pay the Agents hefty amount almost double the original charges and encourage the Agent culture? But guess I am in minority again. :-(

Any businessman - be it a manufacturer, service provider, a building contractor, jeweller - have to pay bribes at the government office to get/renew licenses; as if this has become a norm. Examples of a successful clean businessman have become rare. Paying or taking bribes seems to be a socially accepted practice just as consuming liquor or going to a disco/dance bar.

Busy parents are attending every demand of their kids to keep them happy and warm; is it a give-and-take for the time that they cannot spend with the kids? Those who don't do it often are succumbed to the peer pressure. Are we creating a healthy future for our children when we encourage them to eat junk food regularly, celebrate birthdays in restaurants or gifting them expensive things for their age?

I again find myself in minority, but this time I thank God because my conscience tells me that it is better to be with my children - playing games, going to parks, occasionally eating outside, going on a vacation with them - than to succumb to their unreasonable demands. We just need to be little bit strict and firm with ourselves.

So, are you in a minority and feeling proud about it? Or are you succumbing to the current social norms and be happy that you are not the only ones? Ask and decide yourself!

Being in minority on the above matters won't draw any benefits for you from Government schemes; however you would certainly be more satisfied and happy with yourself that you are on the right path to secure an environment friendly, value-based happy future for the generations to come.

Perhaps you will be awarded with lots of मनःशांती which will be with you forever, choice is yours.

Saturday 24 May 2014

"सीतामाई ते जशोदाबेन" च्या निमित्ताने….

नमस्कार मित्रांनो,

खूप दिवसांनी पुन्हा लिहावयास घेतले आहे. मध्यंतरी कामाच्या गडबडीत मनात अनेक विषय घोळत असूनही लिखाण जमले नाही. 

दै. लोकसत्ताची शनिवारची "चतुरंग" आणि रविवारची "लोकरंग" ह्या पुरवण्या म्हणजे वाचनाची आवड असणार्यांकरता खजिनाच असतो. 

शनिवार दि. १० मे २०१४ च्या "चतुरंग" पुरवणीमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून २ लेख प्रसिद्ध झाले होते. 

त्यातील पहिला "सीतामाई ते जशोदाबेन" हा लेख प्रसिद्ध लेखिका आणि महिलावादी कार्यकर्त्या नीरजा यांनी लिहीला होता. लेखाचा सूर एकूण पुरुष लोक स्त्रियांवर अन्याय कसा करतात आणि तरी सुद्धा स्त्रिया पुरुषांची वाट बघत किंवा त्यांचे वर्चस्व मान्य करण्यात धन्यता का मानतात असा होता. मला तो लेख खूप एकांगी वाटला व म्हणून मी लोकसत्ताला पत्र लिहिले आहे. ते खाली देत आहे. लोकसत्ता केंव्हा छापेल किंवा छापेल की नाही हे माहिती नाही म्हणून शेवटी मी ते इथे देण्याचे ठरवले. 

याच अंकात दुसरा लेख "हिच्यापोटी जन्म असावा…" हा सौ. माधवी कुंटे आणि त्यांचे पती श्री. मोरेश्वर कुंटे यांनी त्यांच्या विकलांग मुलाला कसे वाढवले व स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली त्यावर आहे. लेख अप्रतिम आहे. तो आपण सर्वांनी जरूर वाचावा. 

मूळ लेख इथे वाचा: "सीतामाई ते जशोदाबेन"

या लेखावरील लोकसत्ताला पाठवलेली माझी प्रतिक्रिया खाली देत आहे… 

========================================================================
मा. संपादक,
दै. लोकसत्ता
पुणे 

संदर्भ :- दि. १० मे २०१४ च्या चतुरंग पुरवणीमधील "सीतामाई ते जशोदाबेन" हा लेख

महोदय,

वरील लेख वाचला. दुर्दैवाने लेख अतिशय एकांगी आहे.  

नीरजा बाईंनी उल्लेख केलेले राम, लक्ष्मण, परशुराम, रामदास आणि ज्ञानेश्वर हे काही या जगात आता नाहीत, त्यामुळे त्यांच्या कृत्यांचे स्पष्टीकरण वा समर्थन ते करू शकणार नाहीत. त्यामुळे तर त्यांच्यावर टीका करणे अधिकच सोपे आहे. ही उदाहरणेच मुळी इतकी जुनी आहेत की त्या त्या वेळच्या परिस्थितीकडे आताच्या काळाचा चष्मा लावून बघणे चूक आहे. आज समाजमान्य असलेल्या काही प्रथांवर अजून १०० वर्षांनी टीका होऊ शकेल पण आज तरी त्या प्रथा समाजमान्य आहेत ना? 

उदा. आज घरातील कार्याच्या निमित्ताने मित्र-मंडळी, नातेवाईक, इ. बोलाविण्याची प्रथा आहे, कदाचित भविष्यकाळात आपला समाज अजून आधुनिक, तंत्रावलंबी (technology driven) झाल्यामुळे नातेसंबंध हे विरून जातील व आजची ही प्रथाही त्यावेळेस वेडेपणाची वाटेल, कोणी सांगावे?

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, सावरकर, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, कॉम्रेड डांगे या थोर पुरुषांनी आपापल्या बायकांवर अन्याय केला असे नीरजा बाई म्हणतील काय? 

मुद्दा असा आहे की नवरा आणि बायको यामध्ये जो जास्त कर्तृत्ववान असतो त्याची ओळख जगाला जास्त होते, त्यात बाई किंवा पुरुष असा भेद नसतो; पुढे त्यांचा मुलगा किंवा मुलगी अधिक कर्तृत्ववान निघाली तर त्या मुलाचे किंवा मुलीचे आई-बाबा म्हणून जग त्यांना ओळखायला लागते. उदा. ज्या रमेश तेंडुलकरांना सुरुवातीला स्वतःची ओळख होती, पुढे सचिन कर्तृत्वाने मोठा झाल्यावर त्यांची ओळख सचिनचे बाबा म्हणूनच झाली. या मध्ये त्यांना किंवा सचिनच्या आईना कमीपणा कसा येतो?

इतिहासात सुद्धा आपणा सर्वांना आठवण राहते ती झाशीच्या राणीची, त्यांच्या पतीची नाही. तसेच सरोजिनी नायडू, अरुणा असफ अली, इंदिरा गांधी, चंदा कोच्चर, इंद्रा नूयी, किरण बेदी, इ. अनेक स्त्रिया त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या पतींपेक्षा जास्त लोकप्रिय होत्या/आहेत. मग त्यांच्या पतींवर त्यांनी अन्याय केला असे म्हणता येईल का? स्त्री-मुक्तीवादी कार्यकर्त्यांनी या अशा पतींना समाजासमोर का आणले नाही? 

नवरा-बायकोतील संबंध हा खरे तर संपूर्ण त्या दोघांमधला खाजगी प्रश्न आहे. जशोदाबेन या साठी ओलांडलेल्या बाई काही अडाणी नाहीत, त्यांनी स्वतःच्या बुद्धीनुसार मुलाखत दिली. मग नीरजा बाई किंवा या देशातले तथाकथित विचारवंत जे त्यांच्यावर टीका करतात, ते जशोदाबेन यांच्या व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्यावर घाला घालत नाहीत का?

आजच्या आधुनिक युगात जिथे नवरा-बायको दोघेही नोकरी करतात तिथे अनेक घरात दोघेही जबाबदार्या वाटून घेऊन पार पाडतात. समाजात आपणाला अपेक्षित बदल हा केवळ टीका करून होत नाही तर त्याला सकारात्मक उदाहरणांचीही जोड द्यावी लागते हे लक्षात घ्यावे अशी नम्र विनंती.

तेंव्हा महिला/मातृदिनाचे निमित्त साधून आपल्या मनातील स्त्रीजातीच्या अहंकाराचे दर्शन एकांगी लेख लिहून करू नये, लिहायचेच असल्यास दोघांना न्याय मिळेल अशी उदाहरणे समाजासमोर आणावीत. त्याचे आमच्यासारखे वाचक निश्चितच स्वागत करतील.

जाता-जाता: त्याच अंकात "हिच्यापोटी जन्म असावा..." या लेखातील सौ. माधवी कुंटे यांना त्यांच्या असीम त्याग, धैर्य, परिश्रम याबद्दल शतशः वंदन. तसेच त्यांचे पती श्री. मोरेश्वर कुंटे यांना पण शतशः प्रणाम. पण मातृदिनी हा लेख छापला गेल्याने श्री. मोरेश्वर यांच्या त्यागाची, परिश्रमाची आणि त्यांनी बायकोला दिलेल्या साथीची योग्य तेवढी दखल लेखात घेतली गेली नाही असे वाटले. हा लेखिकेचा दोष म्हणायचा की मातृदिनाचा?

माझे पत्र आपण छापावेत ही आपणाला नम्र विनंती. धन्यवाद. कळावे. 

आपला,
धनंजय सप्रे
========================================================================

Monday 31 March 2014

वसुंधरेवरील तारे - मिलिंद प्रभाकर सबनीस

काही माणसांची नावे समोर आली की लगेच आपल्यासमोर ज्यामुळे ते ओळखले जातात तो विषय येतो, इतकी ती माणसे आणि त्यांचा विषय हे एकरूप झालेले असतात. उ.दा. डॉ. माशेलकर म्हटले की आपल्याला हळदीच्या किंवा बासमतीच्या पेटंटची लढाई आठवते. डॉ. वर्गीस कुरियन म्हटले की अमूल आठवते. 

आज मी आपल्याला ज्याची ओळख करून देणार आहे त्या मिलिंद प्रभाकर सबनीसचे नाव घेतले की वन्दे मातरम हे ओघानेच येते. गेली २० वर्षे मिलिंद ज्या तन्मयतेने आणि परिश्रमपूर्वक वन्दे मातरम या गीताचा अभ्यास करतो आहे, त्यामुळे मिलिंद आणि वन्दे मातरम हे जणू काही synonym च झाले आहेत. 

पण मिलिंदच्या एकूण आयुष्यावर नजर टाकली तर असे लक्षात येईल की अवघ्या ४५ वर्षांच्या आयुष्यात त्याने किती विविध कामे केली आहेत. नुसते चाकोरीबद्ध जीवन न जगता काहीतरी विशेष निर्माण केले आहे आणि म्हणून त्याच्या या ओळखीनेच माझ्या "वसुंधरेवरील तारे" या मालिकेची सुरुवात करत आहे. 

मिलिंदचा जन्म पुण्यातल्या नारायण पेठेतला. वडील - प्रभाकरपंत - व काका - मनोहरपंत - दोघेही उत्तम भजन गायक, आजोबांनी सुरु केलेले श्री भक्त भजनी मंडळ, काकांनी १९५० साली सुरु केलेले संगीत भजन मंदिर यामुळे घरात संगीताचे वातावरण कायमच असायचे. अशा वातावरणात मिलिंदवर संगीताचे संस्कार झाले नसते तरच नवल. बाबा व काकांच्या शेजारी बसून त्यांची भजने ऐकताना मिलिंद स्वतःच गाऊ कधी लागला हे त्याचे त्यालाच कळले नाही. आणि तो इ. तिसरीत असताना एके दिवशी त्याने आपले पहिले कीर्तन सादर केले. भजनाच्या निमित्ताने अनेक मोठी मंडळी त्यांच्या घरी यायची व त्यामुळे त्यांचा सहवास मिळायचा. पुढे २००० साली त्याचे बाबा गेल्यावर त्याने भजनाची परंपरा पुढे सुरु राहावी म्हणून भजने शिकवायला सुरुवात केली ती आजतागायत चालू आहे. 

मिलिंदचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील नवीन मराठी शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण रमणबाग शाळेतून झाले. शालेय जीवनात मिलिंदला खेळाचा ओढा कमी व पुस्तकांचा जास्त होता. त्यामुळे मिलिंदचा बराचसा वेळ हा ग्रंथालयातच जायचा. त्याची पुस्तकांची आवड बघून शिक्षकांनी मिलिंदला ग्रंथालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सोपविली. त्यामुळे अनेक पुस्तकांचा खजिना मिलिंदला सहज उपलब्ध झाला. मग त्याने "समग्र सावरकर" इ. ९ वीतच वाचून काढले. याशिवाय घरी भजनाशी संबंधित पुस्तके होती ती सुद्धा मिलिंद वाचत असे. १० वी नंतर Technical line ला न जाता मिलिंदने Art Teacher Diploma केला. आणि पुढे G. D. Arts झाला. शिक्षणाच्या या वेगळ्या वाटेवर आई-वडिलांचा संपूर्ण पाठिंबा त्याला मिळाला. 

शिक्षणाचे शेवटचे वर्ष चालू असतानाच मिलिंदला ज्ञानदा प्रतिष्ठानच्या शाळेत कला-शिक्षक म्हणून नोकरी लागली. शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती नलावडे बाईंनी मिलिंदमधील कला-शिक्षकाला पूर्ण मोकळीक दिली त्यामुळे मिलिंदला आपले कला-गुण जोपासून शिक्षकाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडता आली. अनेक आंतरशालेय स्पर्धांतून मिलिंदच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाटक, नृत्य इ. विभागात भाग घेतला. जिल्हा नाट्य स्पर्धेत शाळेच्या नाटकाचे पूर्ण नेपथ्य मिलिंदने उभे केले. या कामातून मिलिंदने अनेक विद्यार्थी घडवले जे आजही मिलिंदशी एका भावनिक नात्याने बांधले गेले आहेत. त्याचा एक विद्यार्थी आज एका Professional Recording Studio मध्ये महत्वाच्या पदावर काम करतो आहे. मिलिंदच्या या सर्व कामाची पावती ज्ञानदा प्रतिष्ठान संस्थेने त्याच्या वन्दे मातरमच्या कामाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देऊन व्यक्त केली. 

मिलिंद आज ज्या "वन्दे मातरम" मुळे ओळखला जातो त्याची सुरुवात १९९४ साली त्या गीताचे जनक बंकिमचंद्र यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त शाळेतील मुलांसमोर बोलण्याच्या निमित्ताने झाली. त्या वेळेस मिलिंदने श्री. अमरेंद्र गाडगीळ यांनी लिहिलेल्या वन्दे मातरम वरील पुस्तकाचा आधार घेतला. श्री. गाडगीळ यांची इच्छा होती की "वन्दे मातरम" चा कोष तयार करावा; पण १९९४/९५ साली त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने ती अपूर्ण राहिली. कर्मधर्मसंयोगाने त्यांनी केलेले "वन्दे मातरम" विषयावरील सर्व काम - टिपणे, चित्र प्रदर्शन वगैरे - मिलिंद कडे चालून आले. तेंव्हा श्री. अमरेंद्र गाडगीळ यांनी सुरु केलेले "वन्दे मातरम" कोषाचे अर्धवट राहिलेले काम मिलिंदने पूर्ण करावे असाच जणू संकेत मिळाला. आणि मग मिलिंदने "वन्दे मातरम" या गीताविषयी नवीन-नवीन माहिती मिळवण्याचा चंगच बांधला व त्या दृष्टीने जवळपास ५ वर्षे अखंड काम केले. त्यातून "वन्दे मातरम - एक शोध" हे पुस्तक जन्माला आले. 

१९९९ साली "वन्दे मातरम" गीताला १२५ वर्षे पूर्ण होत होती, या निमित्ताने मिलिंद काम करत असलेल्या ज्ञानदा प्रतिष्ठानने ते वर्ष "वन्दे मातरम" शतकोत्तर रौप्य-महोत्सवी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरवले. ते निमित्त साधून मिलिंदचे पुस्तक मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध करावे अशी सूचना मा. श्री. मोरोपंत पिंगळे यांनी केली व त्या कार्यक्रमासाठी स्वतःहून सर्वतोपरी मदत केली. मिलिंदला लाल-बाल-पाल यांच्या नातवांचे पत्ते देणे असो, त्यांना पत्र लिहिणे असो नाहीतर भाई महावीर यांचे नाव सुचवणे असो, अशा प्रकारची सर्व मदत मा. मोरोपंतांनी केली. ज्ञानदा प्रतिष्ठानच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीने पुढाकार घेऊन हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम यशस्वी केला. आपल्या शाळेतील एका साध्या कला-शिक्षकाने लिहिलेल्या पुस्तकाला एवढे मोठे नाव मिळवून दिले हीच त्या संस्थेने मिलिंदच्या कामाला दिलेली पावती होती. 

"वन्दे मातरम" गीताच्या या शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती वर्षाचा समारोप पुण्यातील ६५ शाळांतील विद्यार्थ्यांच्या सामुहिक "वन्दे मातरम" गीताने करावा अशी कल्पना पुढे आली. आणि आश्चर्य म्हणजे सर्वात चांगला प्रतिसाद अँग्लो-उर्दू शाळेतून मिळाला; त्या शाळेतून जवळपास १२५ विद्यार्थीनी कार्यक्रमात सामील झाल्या. मुख्य कार्यक्रम नेहरू स्टेडीयम येथे झाला. ६५ शाळांतील जवळपास ११००० विद्यार्थ्यांनी सामुहिक संपूर्ण वन्दे मातरम गीत म्हटले. हा एक अभूतपूर्व असा कार्यक्रम होता ज्याचे कौतुक विविध स्तरांतून झाले. 

मिलिंदला आजपर्यंत काही पुरस्कार मिळालेले आहेत. उ. दा. कै. राम शेवाळकर यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मे २००९ मधे मिळाला. गुरुवर्य ल. ग. देशपांडे आदर्श शिक्षक पुरस्कार २०१२ मधे मिळाला. या वर्षी जानेवारी २०१४ मध्ये कै. इंदिरा अत्रे (श्रीमती प्रभा अत्रे यांच्या आई) पुरस्कार मिळाला. 

प्रख्यात नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद - जे मूळचे चित्रकला शिक्षक - त्यांना मिलिंद गुरुस्थानी मानतो. त्यांच्या चित्रांचे आणि टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात मिलिंदचा मोठा हात होता. मुळगुंद सरांच्या सहवासामुळे मिलिंद नाट्यसंस्कार संस्थेत दाखल झाला. मुळगुंद सरांनी लिहिलेली २ बालनाट्ये मिलिंदने उभी केली. त्याशिवाय इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी असलेली भालबा केळकर नाट्य-स्पर्धा आणि दिवाकर नाट्य-छटा स्पर्धा या दोन्हींचे आयोजन मिलिंदने १९९० पासून सलग ९ वर्षे यशस्वीपणे केले. या स्पर्धांमध्ये तोचतोचपणा येऊ नये म्हणून मिलिंदने शिक्षक व पालकांना प्रोत्साहित करून त्यांच्याकडून नवीन नाट्य-छटा लिहून त्या सादर करून घेतल्या. पुढे जाउन या नाट्य-छटांचे पुस्तक संपादनाचे कामही केले. आणि हे सर्व कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा न बाळगता केवळ कलेवरच्या प्रेमापोटी मिलिंदने केले. 

मिलिंदचे नाट्य-प्रेम इथेच संपले नाही. "नांदी ते भरतवाक्य" अशा पद्धतीचे नाटक त्याने प्रथमच शालेय रंगभूमीवर आणले. गेली २५ वर्षे मिलिंदने पुरुषोत्तम करंडकाची अंतिम फेरी पाहणे चुकवलेले नाही. १९९५-९६ मध्ये नाट्य-संस्कार संस्थेतर्फे राज्य-स्तरीय नाट्य स्पर्धेत "तक्षकयाग" हे २ अंकी नाटक निर्मित केले ज्यात आजचा प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने काम केले होते. या नाटकाचे ३ प्रयोग मिलिंदने केले. या नाटकाला कामगार कल्याण नाट्य-स्पर्धेत नाटकाला तिसरे, नेपथ्य, प्रकाशयोजनेला पहिले आणि अभिनयाला तिसरे अशी एकूण ४ पारितोषिके मिळाली. जेंव्हा १९९९ मध्ये मिलिंदने "वन्दे मातरम"च्या विषयाला झोकून द्यायचे ठरवले त्यावेळी कुठलीही कटुता न आणता तो नाट्य-चळवळीतून बाहेर पडला. 

१९९९ मध्ये "वन्दे मातरम" गीताच्या शतकोत्तर रौप्य-महोत्सवानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमासाठी ज्ञानदा प्रतिष्ठान संस्थेचे खूप मोठे सहकार्य मिळाले होते; पण एक शैक्षणिक संस्था म्हणून मिलिंदच्या नियोजित "वन्दे मातरम"च्या शोधकार्याला सहकार्य देणे संस्थेला शक्य नव्हते. म्हणून काही समविचारी मित्रांनी एकत्र येउन "जन्मदा प्रतिष्ठान" नावाची संस्था सुरु केली. या संस्थेचे उद्दिष्ट होते - "वन्दे मातरम" विषयाशी निगडीत कार्यक्रम सादर करणे, त्याच्याशी संबंधित वस्तू, हस्तलिखिते, इ. दुर्मिळ गोष्टींचा संग्रह करणे, इ. याचाच एक भाग म्हणून कै. वसंत पोतदार यांचे "वन्दे मातरम" या विषयावर एक व्याख्यान आयोजित केले. जन्मदा प्रतिष्ठानने २००३ पासून सलग ५ वर्षे दिवाळी अंक काढले त्यातील २००७ चा अंक हा इंटरनेट वरून प्रसिद्ध केला. २००३ ला "धर्म आणि राजकारण", २००४ ला "काश्मीर", २००५ ला "शाकुंतल ते शापित गंधर्व" आणि २००६ ला "भारतीय भाषांतील सांस्कृतिक कथा" असे विशेष दिवाळी अंक अतिशय मेहनत घेऊन काढले. २००३ च्या पहिल्याच अंकाला का. र. मित्र पुरस्कार मिळाला. दुर्दैवाने दिवाळी अंकाना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 

हे सर्व करत असताना "वन्दे मातरम" विषयीची माहिती मिळत होती व त्याच्या संकलनाचे काम मिलिंद करत होता. १९९४ साली शाळेत बोलण्याच्या निमित्ताने मिलिंदचा "वन्दे मातरम"चा प्रवास सुरु झाला. श्री. अमरेंद्र गाडगीळ यांच्या पुस्तकाने त्याला भारून टाकले. मोगुबाई कुर्डीकर आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी गायिलेल्या "वन्दे मातरम" गीताने तो मंत्रमुग्ध झाला. मास्तर कृष्णराव यांनी "वन्दे मातरम" हे राष्ट्रीय गीत व्हावे म्हणून पंडित नेहरू यांच्याबरोबर जो सांगीतिक लढा दिला त्यावर मिलिंदने एक लेख लिहिला. त्या लेखामुळे त्याची भेट मास्तरांचे चिरंजीव श्री. राजाभाऊ फुलंब्रीकर यांच्याबरोबर झाली. हळूहळू जशी ओळख वाढत गेली तशी राजाभाऊ यांनी  मिलिंदला मास्तरांच्या खजिन्यातील "वन्दे मातरम"शी संबंधित सर्व माहिती उपलब्ध करून दिली. "वन्दे मातरम" च्या शोधानिमित्ताने मिलिंदने मे १९९९ मध्ये गीताचे जन्मस्थळ नैहाटी (कोलकाता) येथे भेट दिली. याचबरोबर मिलिंदने "वन्दे मातरम" गीताच्या ध्वनिमुद्रिकाही जमवायला सुरुवात केली. आज त्याच्याकडे या गीताच्या १७५हून अधिक ध्वनिमुद्रिका आहेत.

त्यानंतर मिलिंदने भारताच्या राष्ट्रध्वजाच्या प्रवासाचा सखोल अभ्यास करून "राष्ट्रध्वज - प्राचीन ते अर्वाचीन" हे पुस्तक लिहीले. ह्या पुस्तकाद्वारे त्याने आपल्या राष्ट्रीय मानचिन्हाच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा वेध घेतला. मिलिंदने राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रगीताचाही शोध घेऊन "जनमनातील जन-गण-मन" हे पुस्तक प्रसिद्ध केले. या दोन्ही पुस्तकांचे वाचकांनी भरपूर कौतुक व स्वागत केले.


सध्या मिलिंद "समग्र वन्दे मातरम"हा माहिती कोश काढायच्या कामात पूर्ण बुडून गेला आहे. या कोशामध्ये "वन्दे मातरम" चा विविध अंगाने केलेला विचार तो मांडणार आहे. त्यात "वन्दे मातरम" वर गेल्या १२५ वर्षात जे लेख प्रसिद्ध झाले त्याची सूची आहे, तसेच जवळपास ३०० लेखातील २५ लेख समाविष्ट केले आहेत, यातील संगीत विभागात "वन्दे मातरम" च्या ध्वनिमुद्रिका, ध्वनिफिती आणि ध्वनिचित्रमुद्रण यांची सूची आहे, अनेक दुर्मिळ कागदपत्रे, प्रसाराकांची माहिती, "वन्दे मातरम" च्या अनुषंगाने भारतमातेची विविध चित्रकारांनी काढलेली चित्रे अशी असंख्य माहिती दोन खंडात लवकरच प्रकाशित होणार आहे. या कामाने मिलिंद आणि त्याची पत्नी - शिल्पा - दोघेही प्रचंड झपाटून गेले आहेत. 

मिलिंदच्या कामाची दखल वर्तमानपत्रांनीसुद्धा घेतली आहे:





तर असा हा मिलिंद. ज्या वयात इतर आकर्षणांकडे ओढला जाण्याची शक्यता असते, त्या वयात केवळ "वन्दे मातरम" चा ध्यास घेऊन तेच आयुष्याचे ध्येय बनवलेला, पैसा, प्रतिष्ठा इ. मिळवून आरामात आयुष्य व्यतीत करण्याच्या असंख्य संधी सोडून देऊन एका राष्ट्रीय कामाला स्वतःला वाहून घेणारा आणि हे सर्व करत असताना सदैव हसतमुख, प्रसन्न आणि प्रचंड समाधानी असणारा मिलिंद.

अशी माणसे आजकाल खूप दुर्मिळ झाली आहेत. म्हणूनच मिलिंद हा आपल्या जगातला एक महत्वाचा तारा आहे. 

Sunday 30 March 2014

वसुंधरेवरील तारे

India during Diwali - courtesy NASA
मित्रांनो,

नमस्कार. तुम्ही कधी रात्रीच्या अंधारात आकाश पाहिलेत का हो? नसले तर जरूर पहा. विशेषतः शहरापासून दूर एखाद्या शांत खेड्यात जाऊन. आणि ते सुद्धा अमावस्येच्या रात्री. मग तुम्हाला कळेल की ते नभांगण कित्येक असंख्य तार्यांनी उजळून टाकले आहे ते! त्यातील काही तारे स्वयंप्रकाशित तर काहींनी उसना प्रकाश घेतलेला. पण सर्वांच्या अप्रतिम टीम वर्कने संपूर्ण आकाशाला जणू चंदेरी झळाळी प्राप्त होते. आपले हे कर्तृत्व त्या तार्यांना समजत असेल का? नक्कीच नाही, तरीही ते रोज प्रकाशतात व आसमंत उजळून टाकतात, एखादे झाड जसे प्रवाशाला अखंड सावली निस्वार्थीपणाने देते ना, अगदी तसेच. 

आपल्या पृथ्वीवरही भारतामध्ये असे असंख्य तारे आहेत. काही खूप प्रसिद्ध तर काही तुलनेने कमी प्रसिद्ध. पण काही मात्र प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांचे काम अनेक वर्षे करत आहेत, व भारतरूपी नभांगण आपल्या कामाच्या शुद्ध प्रकाशाने उजळून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांना भेटलात तर तुम्हाला लक्षात येईल की ते करत असलेल्या कामामध्ये ते प्रचंड आनंदी व समाधानी आहेत, जणू त्यांच्या कामाचे फलित हेच त्यांच्यासाठी एक मोठे पारितोषिक आहे. आजकालच्या व्यावहारिक/भौतिकवादी (materialistic) जगात एखादे व्रत घेऊन, सर्व मान-सन्मान, प्रसिद्धी, पैसा, कुटुंब इ. गोष्टींपासून दूर राहून आपले इप्सित ध्येय गाठण्यासाठी अखंड परिश्रम करत राहणे आणि ते सुद्धा कोणाविषयी तक्रार न करता, ही अतिशय अवघड गोष्ट आहे.

इथे मला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील एक प्रसंग वाचलेला आठवतो. सावरकर अंदमानात तुरुंगात असताना त्यांच्या पत्नी - माई - त्यांना भेटायला गेल्या. सावरकरांचे हाल बघून त्या हेलावून गेल्या व त्यांचे डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. तेंव्हा सावरकर त्यांना म्हणाले की अगं माई, रडू नको, संसार काय चिमण्या-कावळे पण करतात, आपल्याला अभिमान वाटायला हवा की आपण आपला संसार या भारतभूसाठी सत्कारणी लावत आहोत. 

आपण ज्या लोकांची ओळख या सदरातून करून घेणार आहोत ते सर्व जण एका अर्थाने जीवनव्रतीच आहेत.

आधी म्हटल्याप्रमाणे भारतामध्ये असे असंख्य तारे आहेत उ. दा. डॉ. अब्दुल कलाम, कै. बाबा आमटे, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. माशेलकर, श्री. बाबासाहेब पुरंदरे, श्री. बिंदुमाधव जोशी,  इ.  पण या सर्वांबद्दल खूप लोकांनी याआधीच इतके लिहून ठेवले आहे की मी आणखी वेगळे काय लिहिणार? 

मग मनात आले की मी ज्यांना व्यक्तीशः ओळखतो आणि ज्यांची जगाला नगण्य किंवा अतिशय थोडी माहिती आहे अशांबद्दल लिहावे. माझे परमभाग्य की मी या लोकांचे कार्य गेले काही वर्षे अतिशय जवळून बघितले आहे. त्यांची कामावरची अविचल निष्ठा, त्यासाठी वाट्टेल तितके परिश्रम करण्याची तयारी आणि निस्वार्थी भावना या गुणांनी मी स्तंभित झालो आहे. 

या लोकांकडे बघताना मला एका गीताच्या खालील ओळी आठवतात:

तन समर्पित, मन समर्पित, और यह जीवन समर्पित, चाहता हूँ मातृभू तुझको अभी कुछ और भी दूं !

आणि मग ठरवले की आपण आपल्या मर्यादित मित्रपरिवाराला त्यांची ओळख करून द्यायची, म्हणून हे सदर. आणि याकरता वर्षप्रतिपदेसारखा दुसरा मंगल दिवस तो कोणता?

तेंव्हा उद्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या सदरातील पहिले पुष्प सादर करीत आहे.

त्यांची ओळख झाल्यावर तुम्हालाही कदाचित वाटेल की किती सार्थ आहेत वरील ओळी या लोकांसाठी. यातून आपल्या सर्वांना थोडे अंतर्मुख होऊन समाजासाठी/देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली तर माझ्या लिखाणाचे सार्थक झाले असे मला वाटेल. 

गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तुमच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा. धन्यवाद.

Saturday 8 March 2014

अनमोल रतन (Precious Jewels) - 3 : Song dedicated to today's women

Friends,

This is the third song in the series. In my view, this song very aptly epitomizes today's woman, particularly a strong woman of the new age. And what could be a better day than today - the "International Women's Day" - to publish this song?


Song #3 : जाओगे ठेस लगाके, बहोत पछताओगे बालम… 


Film       : Fareb (1953)

Director : Shaheed Latif

Cast       : Kishore Kumar, Shakuntala, Lalita Pawar, Zohra Sehgal, Tiwari, Amar

Anil Biswas and Lata Mangeshkar
Courtesy: www.stampboards.com

Lyrics:
Majrooh Sultanpuri

Composer:
Anil Biswas

Singer:
Lata Mangeshkar



USP of the song:


However this particular song जाओगे ठेस लगाके stands out from the rest, here is why:

If you look at most of the films from the Black & White era, you will find that all the female lead characters in the film were portrayed as extremely soft, sensitive, dependent, low in confidence, पतिव्रता, etc. and which was more or less true in those days since Indian community was mostly male dominated. You will remember dialogues like "मै तुम्हारे चरणों की दासी हूँ" or "तुम मर्द हो ना, इसीलिए हमेशा दिमाख से काम लेते हो, कभी कभी दिल से भी काम लिया करो". 

And here comes the heroine of this film who drags herself out of the traditional image and virtually blasts off her beloved with words which were very strong compared to her peers in other films. This was rare and extremely brave considering the era in which the film was released. Just look at the words in the stranza - पहरो उदास फिरोगे मोहे जो नहीं पाओगे बालम or जाते हो तो जाओ अँखियाँ बदलके...

The lead female role was performed by Shakuntala. I tried to check if it was Shakuntala Paranjapye or Baby Shakuntala, but unfortunately cannot confirm anything. 

I wish if it would have been Shakuntala Paranjapye (mother of Sai Paranjapye), how befitting it would have been to have this song filmed on her; since she herself was one of the revolutionary women in India in those days because of her work in the family planning field since 1938.

Hats off to late Majrooh ji for penning down one of the most brave songs in the history of Hindi film music. Composition by late Anil da has also matched the revolutionary mood of the female character. It was Anilda's pure genius that all 3 stranza have been composed differently. Lata ji, as usual, has been phenomenal in her rendering.

So, enjoy the song and the day!




Lyrics: (courtesy http://smriti.com/hindi-songs/)



Friday 31 January 2014

अनमोल रतन (Precious Jewels) - 2

Friends,

This is the second song in the series from the film 'Bewafa' (1952).


Song #2: दिल मतवाला लाख संभाला … 



Film       : Bewafa (1952)

Director : M. L. Anand

Cast       : Raj Kapoor, Nargis and Ashok Kumar



Lyrics          : Sarashar Sailani
Composer    : Alla Rakha Quereshi
Solo Singers : Lata Mangeshkar and Talat Mahmood


Alla Rakha Quereshi
The stylistic music of Bewafa was worthy of kudos. The simple reason being that it was composed by the world famous Tabla maestro Ustad Alla Rakha


Alla Rakha Quereshi was born on April 29, 1919, at Phagwal village of Jammu, 80 kms from Lahore. Khan was fascinated with the sound of tabla since the age of 12. The determined young lad ran away from the house and became a disciple of Mian Qader Baksh of the Punjab Gharana, who initiated him into the world of music.
 

He started his musical career as an accompanist in Lahore and then as an AlI India Radio staffer in Mumbai in 1940. Soon after he would compose music for a couple of Hindi films from 1943-48. He composed music for around 40 films in his film music career. Some of the well known films where Alla Rakha was music composer are Maa Baap (1944), Sabak (1950), Bewafa (1952), Khandaan (1955) and Parveen (1957).

In the film 4 songs were in Talat Mahmood's voice. 'Tum Ko Fursat Ho Meri Jaan..', 'Tu Aaye Na Aaye Ae Teri Khushi....', 'Dil Matwala...' and 'Kaam Haathon Ka Hai...'.


Lata sang 3 songs. 'Badnasibi Ka Gila Ae Dil-e-Nashaad Na Kar..', 'Isi Ka Naam Duniya Hai...' and 'Dil Matwala Laakh Sambhala...'. The song 'Aa Jao Mere Dilruba..' was sung by Geeta Dutt and 'O Tana Der Na Tana Na Na..' was sung by Shamshad Begum


USP of the song: 

a) Music composed by Tabla Maestro - late Alla Rakha
b) Same song, different composition sung solo by male (Talat) and female singer (Lata)

It has been a strange coincidence that whenever the same song has been sung by a male singer and a female singer in the same film, the male version has got more popular among the audience. I wonder what could be the reason of the fascination for the male voice. 

Some examples that come to my mind are as follows; I am sure there are many more...

1) Zindagi bhar nahin bhoolegi barasaat ki raat... - Rafi and Lata - Gateway of India
2) Jeevan ke safar mein raahi... - Kishore and Lata - Munimji
3) Zindagi ek safar hai suhana... - Kishore and Asha Bhosale - Andaz
4) Dil hoom hoom karein ghabaraye - Lata and Bhupen Hazarika - Rudali
5) Kuch na kaho kuch bhi na kaho... - Lata and Kumar Shanu - 1942, A love story

कहानी behind the song: 


The film depicts the story of a poor girl Roopa (Nargis) who is forced by her alcoholic uncle to work. When she can't meet her uncle's demand to earn money she is thrown out of the house by her uncle when her neighbour Raj (Raj Kapoor) comes to her aid and loans her some money but despite it she finds it difficult to make ends meet and she meets Ashok - a famous painter - for whom she starts acting as a model for his paintings. Roopa's portraits as painted by Ashok become a big hit. Later Roopa marries Ashok but soon Raj reenters her life. Roopa is extremely happy seeing her childhood friend Raj again after a long time and introduces him to Ashok. Both of them urge Raj to sing a song. Raj then sings 'Dil matawala...' for Roopa. The song continues to linger on Roopa's mind and next day morning she sings the same song. The story then follows the love triangle between Roopa, Raj and Ashok. 


Lata's version below has a beautiful musical prelude to it which is equally enjoyable to the actual song.


Talat's version is extremely soft and soothing to ears; don't miss the facial expressions of all the 3 actors, particularly just before the line 'Kar gaye baatein do matawale...'. 

In a strand, till today the bewitching effect of Talat's velvety voice in 'Bewafa' lingers on.




Lyrics: (courtesy: http://www.hindigeetmala.net)