Friday 3 October 2014

मोदीजी - तुम्हारा चुक्याच!

[भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना अनावृत्त पत्र]

==============================


प्रिय प्रधानमंत्री मोदीसाहेब, 

अहो काय हे? आमचा पुरता भ्रमनिरास केलात की हो तुम्ही! तुमची लोकसभा निवडणुकीच्या वेळची भाषणे आम्ही खूपच मन लावून ऐकायचो, विशेषतः तुमचे ते 'अच्छे दिन आयेंगे' आम्हाला भारी आवडायचे. आम्हाला वाटायचे की जसे तुमच्या पक्षात सत्तेचे कमळ फुलले तसे आमच्याही जीवनात सुख, समृद्धी, आराम आणि शांततेचे कमळ फुलेल. तुम्ही जेंव्हा "सबका साथ, सबका विकास" म्हणायचात तेंव्हा आम्हाला वाटायचे की तुम्ही सर्व विरोधकांना बरोबर घेऊन आमचा विकास करणार. परवा १५ ऑगस्टला पण तुम्ही लाल किल्यावरुन केलेल्या भाषणात "मी जनतेचा प्रधान सेवक आहे" असे म्हणालात, त्यामुळे आम्ही जाम म्हणजे जामच खूष झालो होतो. 

पण परवा २ ऑक्टोबरला तुम्ही जेंव्हा स्वच्छता अभियानाची सुरुवात केलीत तेव्हा कुठे आम्हाला कळले तुम्हाला अभिप्रेत असलेल्या "सबका साथ" मध्ये आम्ही पण आलो म्हणून; आणि आमचा पूर्ण भ्रमनिरास झाला. तुम्ही राव आमच्या long week end ची मजाच घालवलीत, हे काही बरे नाही, अगदीच असह्य झाले म्हणून हा पत्र प्रपंच. 


कित्ती कित्ती plans केले होते आम्ही ही सुट्टी आणि थोड्याच दिवसात येणारी दिवाळीची मोठी सुट्टी enjoy करण्याचे. पण आत्ता तुम्ही जणू फर्मानच काढले आहे की प्रत्येकाने वर्षाचे १०० तास म्हणजे एका आठवड्याचे २ तास स्वच्छतेला द्यायचे म्हणून! अहो, तुम्हाला काय माहिती की आम्हाला इथे xxवायला सुद्धा वेळ नसतो. तुमचे एक बरे आहे, तुम्ही पडलात अविवाहित (कागदावर नव्हे पण प्रत्यक्षात), तुम्हाला ना बायकोचा त्रास ना मुला-बाळांचा. आमचे तसे नाही, आम्ही जरी सरकारी कर्मचारी असलो तरी ऑफिसमध्ये आमचे काम सोडून आम्ही किती महत्वाची कामे करत असतो उ. दा. लोकांचे ग्रुप्स जमवून गप्पा झोडणे, त्यांना फुकटचे सल्ले देणे - कुठे investment करायची आणि कुठे नाही, दोनाचे-चार आणि चाराचे-आठ कसे करायचे, याशिवाय ऑफिसमधल्या साहेबाची लफडी, इतरांचे आतले आणि बाहेरचे उद्योग, week end destination कुठले छान आहे, गटारीचे plans, वगैरे वगैरे. शिवाय जर एक-दोन दिवस रजा घेतली की टेबलावर अशी धूळ साठते की ती आमची आम्हालाच झटकायला लागते (आमचे चतुर्थ श्रेणीतले सफाई कर्मचारी आमच्याकडे सह्या मारून शेजारच्या दुकानात कामाला जातात). या सगळ्यात आमचे ८ तास कसे जातात कळतसुद्धा नाही. मग दमून-भागून ६/६:३० ला घरी आल्यावर बायकोच्या हातचा गरम गरम चहा पिऊन जरा शीण घालवायचा, टी. व्ही. वर बातम्या, मनोरंजनाचे कार्यक्रम बघून होईपर्यंत १० वाजतात. त्यापुढे वेळ राहिला व उत्साह वाटला तर मुलांची थोडी फार चौकशी करायची. म्हणजे किती busy routine असते बघा. तरी शनिवार-रविवार सुट्टी असते म्हणून family साठी जरा तरी वेळ देता येतो, बायको-मुलांना घेऊन कधी E-Square मध्ये सिनेमाला जा, कधी मॉल मध्ये खरेदीला जा, तर कधी एखादा week end गाडी काढून picnic ला जा, भरमसाठ कामे हो! आता सांगा या सगळ्या आवश्यक कामांमधून देशाची स्वच्छता करायला वेळ होईल का? तुमचे आपले काहीतरीच!

हे दुःख आमचेच नव्हे तर आमच्या समस्त मित्रांचेही आहे. आमचा मित्र-परिवार खूप मोठा आहे, त्यात वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट, इंजिनीअर, लेखापाल, व्यावसायिक, प्राध्यापक, बँकेचे कर्मचारी, IT वाले,  लेखक, पत्रकार, नाटक-सिनेमावाले, माध्यम-तज्ञ, इ. बरेच आहेत. 

आता वकिलांचेच घ्या ना, किती कष्ट करतात बिचारे होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करायला. ह्याचे वकीलपत्र घ्यावे तर दुसरा मारण्याची भीती; अशा दबावाखाली काम करण्याचे वेगळे पैसे सुद्धा मिळत नाहीत. भर उन्हाळ्यात काळा डगला घालून घामाघूम होत काम करायचे म्हणजे काय चेष्टा आहे? अशिलांचा दबाव असतो तो वेगळाच. मजबुरी का नाम वकील असे म्हणायची वेळ आली आहे. पोटासाठी काय काय करावे लागते तुम्हाला कल्पना नाही. अशा परिस्थितीतून त्यांनी कसे २ तास द्यायचे दर आठवड्याला?

आमचे एक लेखक मित्र आहेत. कधी नाटके तर कधी टी. व्ही. सिरीअल्स, कधी सिनेमा लेखन तर कधी वर्तमानपत्रातून तिरक्या रेघा मारत असतात. त्यांच्या नावाच्या आद्याक्षरांमध्येच "सं. प." असल्याने ते वरील गोष्टींव्यतिरिक्त कधीच काही करत नाहीत. त्यांचे समविचारी लेखक-पत्रकार मित्रांचे टोळकेही तसेच आहे. या लोकांना भारतात काही चांगले चालले आहे असे मुळी वाटतच नाही. यांचा बराचसा वेळ विरोधकांची उणीदुणी काढण्यात जातो. बरं, हे स्वतः काही करणार नाहीत, दुसर्याला उपदेश देणार - कधी फुले जयंतीला तर कधी आंबेडकर जयंतीला. आजकाल २० ऑगस्टला पुण्यातील बालगंधर्व पुलावर जमून निदर्शने करतात. एवढ्या सगळ्या व्यापातून तुमच्या अभियानामागची भूमिका समजून घ्यायला वेळ कुठे आहे? आणि कळली तरी मान्य कसे करणार? अशा संभ्रमावस्थेतून ते मग स्वच्छता करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. 

आमचे डॉक्टर मित्र तर already वैतागलेत! अहो आजकाल जो उठतो तो यांच्याकडे संशयाने बघतो. कोणी म्हणतो Cut Practice करतात, कोणी म्हणतो यांचे racket आहे. आजकालची परिस्थितीच अशी आहे की खाजगी practice चालतच नाही, मग कधी या हॉस्पिटलला तर कधी त्या, धावून धावून जीव दमून जातो. बर गेली ३० वर्षे practice करत आहेत, भरपूर पैसा गाठीशी आहे, म्हटले तर सर्व सुखे हात जोडून दाराशी उभी आहेत, तरी सुद्धा अजून धावपळ चालूच आहे. सकाळी ५ ते रात्री १२ असे रुटीन चालू आहे. का करतोय हे सगळे एवढा विचार करायला सुद्धा फुरसत नाही तिथे स्वच्छता अभियानाला काय डोंबल वेळ देणार हे? 

आमच्या ग्रुप मधला सर्वात तरुण म्हणजे साधारण ३५-४० वयोगटातला मित्र म्हणजे IT वाला. १८ वर्षे नोकरी करतो आहे, एव्हाना ५-६ कंपन्या बदलून झाल्या आहेत. वर्षातून किमान दोनदा तरी परदेश दौरे असतात. यांना आधीच लठ्ठ पगार, त्यात परदेश दौरा करून आले की आणखी कमाई. कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहेत. उच्चभ्रू वस्तीत ३-BHK घर आहे, दाराशी Honda latest model ची गाडी आहे, सुंदर संसार आहे. २ गोंडस मुले आहेत, शिवाय बायकोला पण चांगली नोकरी आहे. "हम दो हमारे दो" एवढेच यांचे जग आहे. महिन्यातून दोनदा गाडी काढायची आणि सुटायचे - कधी कोकणात तर कधी गोव्याला. तेवढाच जरा चेंज!  पण यांचा Work-Life Balance झीरो झालाय म्हणून सारखे रडत असतात. कामाच्या वेळा अतिशय odd झाल्यात, जायची वेळ सांगता येते पण परत यायची वेळ नाही; बर्याच वेळा तर घरीच काम घेऊन यावे लागते, week end ला सुद्धा घरून काम करावे लागते. तरी बरे हाताशी Smart Phone असल्याने सारखे फेसबुक, ट्विटर किंवा WhatsApp वरून नातेवाईक-मित्र यांच्या संपर्कात राहता येते नाहीतर अवघडच होते. संदीप खरे यांची "दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई" ही कविता यांच्यावरच लिहिली असावी अशी शंका येते. या अशा सदैव busy माणसांना कुठला आलाय देशासाठी वेळ? अहो ते परदेशी ग्राहकांसाठी काम करून डॉलर आणतात हीच केवढी मोठी देशभक्ती यांची! त्यांना तुम्ही स्वच्छता वगैरे करायला लावू नका बुवा. 

ते बघा, ते दिसतायत ना ते आहेत आमच्या येथील एका उच्च कॉलेजमधील तरुण-तरुणी. काय म्हणता शरीरयष्टीवरून शाळेतले वाटतात? अहो आजकाल शरीरयष्टी नाही तर Style बघायची असते. कित्ती मेहनत लागते Style develop करायला, Parlor मध्ये तासनतास बसावे लागते मनासारखी Hair Style किंवा Facial करून घ्यायला. अधून मधून सारखे मॉल मध्ये जाऊन Latest Fashion चा study करायला लागतो, नाहीतर ग्रुप मध्ये टिंगल होते ना. शिवाय आई-बाबांच्या मागे लागून latest smart phone आणि टू-व्हीलर पण घ्यावी लागते. Parents ना पटवायचे म्हणजे सर्वात difficult आहे. त्यांचे मूड्स बघायचे, ते किती बिझी आहेत याचा अंदाज घ्यायचा आणि बरोबर वेळ साधायची. हे म्हणजे काय Pizza खाण्याइतके सोपे काम आहे का? या सगळ्यातून वेळ झालाच तर कॉलेजला जायचे. एक वेळ तिकडे गेले नाही तरी चालते पण क्लास मात्र अटेंड करावाच लागतो, भरपूर पैसे भरले आहेत ना तिथे! तर या सगळ्या Up-to-date राहण्याच्या गडबडीतून या पोरांना देशाच्या स्वच्छतेसाठी वेळ कुठून मिळणार? अहो यांच्या आई-वडिलांनाच पोरांकडे लक्ष द्यायला वेळ नाही तिथे यांची काय कथा? 

तेव्हा मोदीजी, बघा बुवा, परत एकदा विचार करा तुमच्या महत्वाकांक्षी योजनेचा. आम्ही आपले तुम्हाला घर बसल्या Risks highlight करण्याचे मोठे काम केले आहे, ही सुद्धा एक प्रकारची देशभक्तीच नाही का? :-)

आपला घरबसू देशभक्त,
आ. ग. लावे

2 comments:

  1. Prashant Bhagwat3 October 2014 at 15:07

    Khare aahe mitra- ani ashya lokanna hya swacch nharat madhye suddha rajkaranach disnar. Kay karnaar?

    ReplyDelete
  2. नमस्कार तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे . हा आपला देश आहे आणि या देशा संबंधी माझी पण काहीतरी जबाबदारी आहे याची आज लोकांना जाणिवच राहिलेली नाही .त्यामुळे तुम्ही विचार करायला लावणारा विचार आम्हा सर्वा पर्यन्त पोचवत आहात.

    ReplyDelete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.