Friday 22 November 2013

आपण सगळेच काचेच्या घरातील सहवासी?

लहानपणी वाचलेली एक गोष्ट काल आठवली. ४ मित्र असतात - तिघे अतिशय हुशार पण व्यवहारशून्य असतात; तर चौथा मित्र कमी हुशार पण व्यवहारचतुर असतो. चौघे जंगलातून जाताना त्यांना कोणा प्राण्याची हाडे पडलेली दिसतात. पहिला मित्र आपल्या ज्ञान-कौशल्याने ती हाडे जुळवून त्यातून सिंहाचा सांगाडा बनवतो. दुसरा मित्र त्यात मांस भरून त्यावर त्वचा निर्माण करतो. तिसरा मित्र त्यात प्राण ओतून सिंहाला जिवंत करणार असतो; पण चौथा मित्र त्यांना धोक्याची सूचना देतो. त्याकडे लक्ष न देता तिसरा मित्र त्या सांगाड्यात प्राण ओततो. तोपर्यंत चौथा मित्र पळून गेलेला असतो. सिंह जिवंत होताच उरलेल्या ३ मित्रांना खाउन टाकतो.   तात्पर्य: आपल्या ज्ञानाचा योग्य वापर केला नाही तर ते आपल्यावरच उलटू शकते. 

ही गोष्ट काल आठवण्याचे कारण म्हणजे काल घडलेल्या २ महत्वाच्या घटना - एक तहलकाचे प्रमुख श्री. तरुण तेजपाल यांच्यावर त्यांच्याच एका महिला सहकारीने केलेला लैंगिक शोषणाचा आरोप, तर दुसरी आम आदमी पक्षाच्या काही वरिष्ठ सभासदांचे झालेले स्टिंग ऑपरेशन.

तरुण तेजपाल यांनी सन २०००-२००१ मध्ये २ मोठी स्टिंग ऑपरेशन करून राजकीय आणि क्रीडा वर्तुळात मोठीच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे तत्कालीन वाजपेयी सरकार चांगलेच अडचणीत येउन २००४ च्या निवडणुकीनंतर त्यांना पायउतार व्हावे लागले होते. याचा प्रचंड फायदा तहलकाला आणि पर्यायाने तरुण तेजपालांना झाला.

२००४ मध्ये आलेल्या UPA सरकार दरबारी त्यांचे वजन तर वाढलेच शिवाय दिल्लीतील पत्रकार वर्तुळात प्रतिष्ठा वाढली. UPA सरकार धार्जिण्या विविध वृत्तवाहिन्यांवर तेजपाल व त्यांचे काही सहकारी "विचारवंत" म्हणून मत प्रदर्शन करू लागले. The Guardian आणि Newsweek यांसारख्या आंतरराष्ट्रीय मासिकांनी तेजपाल व त्यांच्या सहकारी शोमा चौधुरी यांना गौरवले. अवघ्या ७-८ वर्षात तहलकाचे रुपांतर एका मोठ्या मिडिया हाउस मध्ये झाले; इतके की गेल्या ३ वर्षांपासून ते मोठ्या शहरांमध्ये ThinkFest भरवायला लागले. आश्चर्य म्हणजे २००७ मध्ये दयानिधी मारन यांच्याविरुद्ध केलेल्या स्टिंग ऑपरेशन शिवाय एकही खळबळजनक कृती UPA सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या कारकिर्दीत तहलकाने केलेली नाही, हा कदाचित योगायोग असू शकेल.

पण हाय रे दैवा, काळाची चक्रे उलटी फिरली आणि तेजपाल यांचे पाय घसरले. इतरांना उठसूट नैतिकतेचे पाठ देणारया तेजपाल यांचे स्वतःचे पाय मातीतेच आहेत हे दिसून आले. ज्या माध्यमांनी तेजपालांना मोठे केले त्याच वृत्तवाहिन्या आज त्यांना जाब विचारात आहेत, त्यांच्या चारित्र्याची चिरफाड करत आहेत. या सगळ्यात काँग्रेसची सावध प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. हे प्रकरण कुठे जाते ते नजिकच्या भविष्यकाळात दिसेलच; पण या निमित्ताने मिडीयारूपी सिंह हा मिडीयावरच उलटला आहे एवढे मात्र खरे.

दुसरी घटना - आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ सभासद - शाझिया अल्मि आणि कुमार विश्वास एका स्टिंग ऑपरेशन मध्ये कॅमेऱ्यासमोर काळे पैसे घेताना व सत्तेत आल्यावर अमुक कामे करून देऊ असे सांगताना दिसतात. केजरीवाल यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा नेता आपल्या सहकार्यांना घेऊन राजकीय व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने पक्ष स्थापन करतो. स्वच्छ चारित्र्य व नीतिमत्ता या गुणांवर पक्ष बांधणीचे स्वप्न बघतो. प्रस्थापित राजकीय पक्ष या नवीन पक्षाकडे "थांबा, थोडेच दिवसात कळेल राजकारण काय असते ते" अशा वृत्तीने बघत असतात. आणि अचानक एक दिवस श्री. अण्णा हजारे आम आदमी पक्षाने गोळा केलेल्या निधीवर प्रश्नचिन्ह उभे करतात, पक्षाचे नेते स्टिंग ऑपरेशन मध्ये सापडतात आणि मग सर्वच जण या पक्षाबद्दल, त्यांच्या हेतूंबद्दल, त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका घ्यायला लागतात.

माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात असा प्रश्न उभा राहतो की आज कोण कोणाला स्वच्छतेचे प्रमाणपत्र द्यायला लायक आहे? जो तो एकमेकांवर आरोप करण्यात गुंतला आहे. राजकीय पक्ष आता आपल्या विरोधकांबद्दल चांगले बोलत नाहीत. दिवस-रात्र प्रत्येक पक्ष हा माझेच कसे खरे आणि विरोधक कसे खोटे / पाताळयंत्री हे सांगत असतो. आपला परस्परांवरचा विश्वास कमी झाला आहे. आपण बघतो सामान्य लोक सुद्धा स्वतःची चूक कबूल करत नाहीत, उलट दुसर्याला दोष देतात. कोणाला कायद्याची भीती राहिली नाही; स्वतःच्या स्वार्थासाठी लोक कुठल्याही थराला जात आहेत, कोणाचे तोंड भरून कौतुक सुद्धा आपण आजकाल करत नाही; अशा परिस्थितीत राजकीय पक्षांकडून काय अपेक्षा करायची?

गुन्हेगारी, अत्याचार, भ्रष्टाचार हे आजूबाजूला होत असताना तुमच्या-माझ्यासारखी पांढरपेशी माणसे एक तर गप्प राहतात अथवा परिस्थितीला शरण जातात. अशाने आपण वाईट गोष्टींना एक प्रकारे उत्तेजनच देत नाही का? स्वच्छ, चारित्र्यवान, चांगले काम करणारी असंख्य माणसे आपल्या देशात आहेत, पण तरी सज्जनशक्तीचा एकत्रित प्रभाव जाणवत नाही.

एका अर्थाने आपण सर्वच जण काचेच्या घरातील सहवासी झालो आहोत; त्यामुळे आपण वाईटाला वाईट म्हणत नाही; अन्यायाविरुद्ध कृती करत नाही, आणि ही माझ्या मते फार भयाण स्थिती आहे.

देशाला आणि प्रत्येक क्षेत्रात आज आवश्यकता आहे ती अशा नेत्याची जो आपल्या वागण्यातून, बोलण्यातून आणि कृतीतून एक आदर्श लोकांपुढे ठेवेल. पण असा आदर्श नेता काय आकाशातून पडणार आहे का? जर बहुसंख्य समाज बदलला तर त्यातून पुढे येणारा नेता हा स्वच्छ, चारित्र्यवान, कृतीशील आणि देशाभिमानी असेल. पण त्यासाठी आपल्या प्रत्येकाला स्वतःत सकारात्मक बदल करावा लागेल आणि नुसते बोलघेवडे न राहता कृतीशील बनावे लागेल.

यासाठी काचेच्या घरातून बाहेर येणे अत्यावश्यक बनते. मग करू या सुरुवात?

No comments:

Post a Comment

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.