Friday 28 February 2020

अप्रूपाचे अप्रूप

लेखाचे शीर्षक बघून चक्रावलात का? पण थोडे थांबा! कारण लेख वाचताना शीर्षकामागचा अर्थ कळेल. :-)

जे मराठी माध्यमात शिकलेले नाहीत त्यांच्यासाठी - "अप्रूप" या शब्दाचे अनेक अर्थ आहेत.  उ. दा.  दुर्मिळ, दुर्लभ, अप्राप्य, नवल, अपूर्वाई, कौतुक वगैरे वगैरे, यालाच इंग्रजीत rare, novel, scarce, unusual इ. म्हणतात.

यातील "अपूर्वाई" हा शब्द जरा अधिक ओळखीचा वाटेल कारण त्या नावाचे पु. लं. चे प्रवासवर्णनाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे.

तसे पाहता माणसांना अनेक गोष्टींची अपूर्वाई असते. फार फार पूर्वी जेंव्हा प्रकाशाचा शोध लागला तेंव्हा दोन दगड एकमेकांवर आपटून होणाऱ्या ठिणगीतून पेटवलेल्या जाळाने होणाऱ्या उजेडाचे लोकांना अप्रूप होते.
तेव्हापासून प्रकाशाचा प्रवास हा लाकूड जाळून, मेणबत्ती पेटवून ते एडिसनने बल्बचा शोध लावला त्या प्रत्येक वेळी लोकांना त्या गोष्टींचे अप्रूपच वाटत होते.

पण फार प्राचीन काळात न जाता गेल्या ७०-८० वर्षात डोकावू या. १९४७ साली जेंव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा कित्येक लोकांकडे रेडिओ नव्हते. त्यामुळे १९५५ साली आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर रविवारी live प्रसारित होणाऱ्या गीत रामायणाचे कित्येकांना अप्रूप होते. कितीतरी लोक गीत रामायण ऐकण्यासाठी हॉटेलातजाऊन तेथील रेडिओवर गाणे ऐकायचे. त्यावेळी असे म्हणतात की हॉटेलातील रेडिओचे इतके अप्रूप होते की लोकं चार आणे देऊन हॉटेलात जाऊन त्यांना आवडणाऱ्या गाण्यांची फर्माईश करायचे. पुण्यात लकडी पुलाजवळचे इराणी हॉटेल (जे आजही तिथेच आहे) आणि लकी रेस्टॉरंट (आज जिथे डेक्कन मॉल आहे तिथे) अशा काही मोजक्या हॉटेलात पैसे देऊन गाणे ऐकण्याची सुविधा मिळायची.

माझे आई-वडील दोघेही सातारचे, घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यामुळे रोजच्या जेवणात भाजी-भाकरीच असायची. गोडधोड आणि पोळी फक्त सणासुदीलाच असायचे. त्यामुळे त्याचे केवढे अप्रूप होते त्यांना त्या वेळी.

माझ्या लहानपणी म्हणजे साधारण १९७० आणि १९८० च्या दशकात आम्हाला असेच TV चे अप्रूप होते. दूरदर्शनवरचे कार्यक्रम बघताना आम्ही भारावून जायचो. दर शनिवारी संध्याकाळी मराठी आणि रविवारी संध्याकाळी हिंदी चित्रपट दाखवला जायचा. त्यावेळच्या वृत्तपत्रांत संपूर्ण वर्षभराची म्हणजे ५२ आठवडे दूरदर्शनवर दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांची यादी छापली जायची. आम्ही राहत असलेल्या इमारतीत फक्त एक-दोघांकडेच TV असल्याने त्यांच्याकडे समस्त बालगोपाळांची गर्दी व्हायची. "पेडगावचे शहाणे" चित्रपट असाच TV समोर फरशीवर बसून बघितल्याचे आठवते.


१९८० पासून दूरदर्शनवर क्रिकेटचे सामने दाखवायला सुरुवात झाली. सकाळी ९:४५ वाजलेपासून दूरदर्शनवर दिसणाऱ्या मुंग्या (पांढरे-काळे ठिपके) बघत कधी एकदा १० वाजतायत आणि गावस्कर बॅटिंगला येतोय असे होऊन जायचे. नंतर १९८० ची विम्बल्डन मधील बोर्ग-मॅकेन्रो यांची अंतिम मॅच, १९८२ चे एशियाड त्यावेळी आलेला रंगीत TV , १९८३ चा भारताने जिंकलेला विश्वचषक, १९८६ चा मॅराडोनाच्या अर्जेंटिनाने जिंकलेला फुटबॉल विश्वचषक हे सर्व कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेने बघितल्याचे आठवतात.


दूरदर्शनवरच्या सर्वच कार्यक्रमांची आम्हाला अपूर्वाई असायची मग तो गजरा असो, साप्ताहिकी असो, चित्रहार असो, सुरभी किंवा ऐसा भी होता है सारखे माहितीपर कार्यक्रम असोत, फूल खिले है गुलशन गुलशन सारखा कार्यक्रम असो, नाटके असोत, पु.लं.चे कार्यक्रम असोत की गाण्याचे कार्यक्रम असोत. या सर्व कार्यक्रमांचा रतीब नसल्याने ते बघण्याची उत्सुकता असायची आणि भरपूर आनंद मिळायचा.

साभार: http://sawaigandharvabhimsenmahotsav.com/Gallery

त्याकाळात पुण्यात संगीत विषयक कार्यक्रमांची रेलचेल नसायची. एक सवाई गंधर्व महोत्सव डिसेंबर मध्ये व्हायचा. याव्यतिरिक्त अधून मधून संगीताचे कार्यक्रम असायचे. त्यामुळे मोठमोठ्या कलाकारांना बघणे/ऐकणे हे तसे दुर्मिळच होते. अनूप जलोटा, गुलाम अली यांचे कार्यक्रम बहुदा कॅम्प मधेच व्हायचे, लता मंगेशकर, आशा भोसले यांचे कार्यक्रम पुणे शहरात व्हायचे. आम्ही संगीतप्रेमी मित्र या कार्यक्रमांना आवर्जून जायचो. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
तीच गोष्ट साहित्यविषयक कार्यक्रमांची. मे महिन्यात होणाऱ्या मॅजेस्टिक गप्पा आणि वसंत व्याख्यानमाला यांची रसिक मंडळी वर्षभर वाट बघत असायची. बाबासाहेब पुरंदरे यांच्या छत्रपती शिवाजीवरील व्याख्यानमाला तसेच शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर यांची भाषणे हे सुद्धा हृदयाच्या जवळचे कार्यक्रम. पुण्यात साहित्य संमेलन असले की चंगळच असायची. अधूनमधून प्रसिद्ध साहित्यिक/कवी यांच्या मुलाखतीचे कार्यक्रम असायचे. या सर्व कार्यक्रमांनी आमचे बालपण आणि तरुणपण समृद्ध केले.


चित्रपट, नाटके ही सुद्धा वर्षातून ५-६ वेळाच बघितली जायची, त्यामुळे गणेशोत्सवात रीळ लावून रस्त्यावरील पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांचे आम्हाला अप्रूप असायचे, व कोण आनंद मिळायचा त्यातून! फारसे Promotion न करताही चित्रपटगृहात गर्दी व्हायची आणि अनेक आठवडे/महिने चित्रपट चालायचे कारण चित्रपट घरात आले नव्हते!

टेलीफोनचेही तसेच. साधारण १९८५ नंतर हळूहळू लोकांकडे टेलीफोन यायला सुरुवात झाली. साध्या लोकल फोनचेही कोण कौतुक असायचे. परदेशात फोन करण्यासाठी टेलिफोन कंपनीकडे बुकिंग करायला लागायचे, तो महागही असायचा.

१९९० नंतर भारतात जसे तंत्रज्ञान विकसित होत गेले, तसे आधी संगणक आले, मग पेजर, मग साधे मोबाईल अंदाजे २००४-५ चे सुमारास आले. त्याचबरोबर १९९२ पासून दूरदर्शनचे जाळेही विस्तारले, त्याला स्पर्धा म्हणून खाजगी वाहिन्या सुरु झाल्या, सुरुवातीला ५-१० वाहिन्याच होत्या, त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांचा दर्जा खूप सरस होता. हळूहळू आपल्याला २४*७ वाहिन्यांची सवय झाली. आणि आता तर काय इंटरनेटमुळे आणि वाहिन्यांमुळे २४*७ करमणूक आपल्या बेडरूममध्येच आली आहे.

गेल्या २०-२५ वर्षांमध्ये आपले जीवनमान प्रचंड बदलले आहे. पूर्वी असलेली एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेली. प्रत्येकाचे स्वतःचे घर झाले. नवरा-बायको दोघेही नोकरी करू लागले, त्यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवणे भाग पडले. घरी कामाला मोलकरणी आल्या. प्रत्येक घरात TV आला, फोन आला, फ्रीज आला, वॉशिंग मशीन आले, Music Systems आल्या, Broadband आले, Smart Phones आले, Online TV Games आल्या, विविध Gadgets आली. कित्येक घरात कार आली. निदान शहरात तरी या सर्व सुख-सुविधा अनेक घरातून आल्या. २००० नंतर जन्मलेली मुले जन्मापासूनच ह्या गोष्टी पाहतच मोठी झाली. एकूण जीवन अतिशय गतिमान झाले. त्यामुळे कित्येक घरात बाहेरून डबा येणे सुरु झाले. आणि वीक-एन्ड म्हणून बाहेर हॉटेलात जेवणे सुरु झाले. Buy 1 Get 1 Free सारख्या योजनांमुळे गरजेपेक्षा जास्त खरेदी होऊ लागली. सगळेच कसे सहज, न मागता आणि मनात आले की मिळू लागले, म्हणतात ना Everything at a Finger tip तसे झाले, त्यामुळे त्याची किंमत कळेनाशी झाली. 

शहरात मोठे मोठे मॉल्स उभे राहिले, सर्व वस्तू कुठेही आणि केंव्हाही मिळू लागल्या. दिवाळीचा फराळ जो माझ्या लहानपणी दिवाळीतच आणि तो सुद्धा आईने केलेला मिळायचा तो आता वर्षभर कुठल्याही दुकानात मिळतो. पूर्वी सुट्टीच्या दिवशी घरी केली जाणारे इडली-वडा सांबार आता जागोजागी असलेल्या हॉटेलात मिळते.  Netflix, Amazon यासारख्या कंपन्यांनी करमणूक घरात आणून ठेवली. सर्व काही आयते मिळू लागले आणि ते सुद्धा मनात आले की. त्यामुळे दुर्दैवाने आज कुठल्याच गोष्टीचे अप्रूप राहिले नाही (अपवाद इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा त्यातील नवनवीन तंत्रज्ञानामुळे). गेल्या १०-२० वर्षात जन्मलेल्या मुला-मुलींना आईच्या हातच्या जेवणाचा आनंद काय असतो माहिती नाही, एखाद्या गोष्टीची वाट बघण्यातील आनंद आणि ती गोष्ट मिळाल्यानंतर झालेला आनंद याला ते मुकले आहेत. मराठी नाटकातील आणि मराठी पुस्तकातील आनंद माहिती नाही, त्यांना त्याचे काही दुःख आहे असेही दिसत नाही. Globalization मुळे सर्व जग इतके जवळ आले आहे की आता परदेशात जाण्याचेही अप्रूप राहिले नाही. Whatsapp, Duo, Skype, विविध Messengers यामुळे परदेशातील व्यक्तींशी सहज आणि म्हटले तर रोजही बोलता येते ते सुद्धा त्यांना प्रत्यक्ष पाहत असताना, एका अर्थाने हे चांगलेच आहे पण त्याचा बरेच वेळा अतिरेक होतो. 

सारांश काय, तर आज तुम्हा-आम्हाला अप्रूपाचेच अप्रूप आहे. एखादी गोष्ट न मिळण्यामागची हुरहूर आणि ती मिळाल्यानंतरचा आनंद हा आता दुर्लभ झाला आहे. जोपर्यंत आपण उपलब्ध असलेल्या सुखसुविधांचा मर्यादित उपभोग घेत नाही, तोपर्यंत आपण अतिरेकाच्याच वाटेवर वाटचाल करत राहणार. हे सर्व कुठे जाणार याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. तो होईल आणि त्यानंतर योग्य ती Corrective Action आपण घेऊ अशी आशा करू या. त्यासाठी शुभेच्छा.














4 comments:

  1. Great journey down memory lane

    ReplyDelete
  2. छान आढावा मागील दशकांचा ...

    ReplyDelete
  3. धनंजय, अप्रतिम लेख! खूप आवडला!

    ReplyDelete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.