Monday 5 September 2016

बाप्पांच्या आगमनाच्या निमित्ताने

गणपती बाप्पा मोरया!

दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक घरांमध्ये एव्हाना बाप्पा आले असतील आणि त्यांची प्राणप्रतिष्ठाही मोठ्या थाटात झाली असेल. जन्माष्टमी पासून सुरु झालेले सणांचे पर्व हे आणखी काही महिने म्हणजे दिवाळी संपेपर्यंत चालेल.

यातील बरेचसे सण हे गेले कित्येक वर्षांपासून सार्वजनिक स्वरूपात साजरे होतात. विशेषतः दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र हे तर फार मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरीत्या साजरे केले जातात. गेल्या १५-२० किंवा कदाचित जास्तच वर्षांपासून या सार्वजनिक उत्सवांना अतिशय बाजारी स्वरूप आले आहे हे कुठलाही सुजाण माणूस मान्य करेल. या उत्सवांच्या निमित्ताने काही वाईट प्रवृत्तीही यात मोठ्या प्रमाणात सामील झाल्या आहेत हे नाकारता येणार नाही. उत्सवांच्या काळात अनेक नागरिकांना प्रचंड अडचणी व मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतुकीचा वाढलेला ताण, हवेच्या व आवाजाच्या प्रदूषणाने गाठलेली अत्त्युच्च पातळी, त्याबरोबर येणारे असंख्य आजार हे सर्व भोगल्यावर याचसाठी केला होता का अट्टाहास असे म्हणायची वेळ येते.

आमचे काही मित्र व स्नेही अत्यंत संतापून आपापल्या Facebook अथवा Whatsapp वर अतिशय तिखट प्रतिक्रिया देतात. या प्रतिक्रियांचा एकूण सूर हा “हे सार्वजनिक उत्सव बंद झाले पाहिजेत” किंवा “टिळक, गणेशोत्सव सार्वजनिक करून तुम्ही फार मोठी चूक केलीत ज्याची फळे आता आम्हाला भोगायला लागत आहेत” असा असतो. ज्यावेळी टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांना कल्पनाही नसेल की १०० वर्षांनी या उत्सवाचे स्वरूप कसे असेल. आणि म्हणून आपण आजच्या चष्म्यातून १०० वर्षांपूर्वीच्या टिळकांच्या त्या योजनेस चूक कसे काय ठरवू शकतो.

हाच न्याय तुम्ही Facebook अथवा Whatsapp च्या निर्मात्यांना लावाल काय? कारण एकूणच सोशल मिडीयाने भारतामध्ये विशेषतः शहरी भागांमध्ये शाळकरी मुला-मुलींपासून ते आजोबा-आजींपर्यंत जो हलकल्लोळ माजवला आहे, ज्याने असंख्य प्रश्न आजच्या पालकांपुढे उभे केले आहेत ते बघता आपण या नवीन तंत्रज्ञानाला दोष देऊ का?

प्रत्येक नव-निर्मितीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारे आपणच असतो हे आपण कधी मान्य करणार? मग मूळ उद्देश सफल व्हावा म्हणून आपण स्वतः काय प्रयत्न करतो? आजही आजूबाजूस बघितले तर अनेक मंडळांचे गणेशोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे होताना आपणाला दिसतील.  ज्ञान-प्रबोधिनी, ‘स्व’-रूपवर्धिनी, रमणबाग शाळा आणि काही संस्था यांची ढोल-ताशा पथके, लेझीम पथके, संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या श्री गणेशापुढच्या भव्य रांगोळ्या, विविध गृहनिर्माण संस्थांमध्ये होणारे चांगले विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यातून फुलत/घडत जाणारी सुसंस्कारीत पिढी आपल्याला दिसत नाही का? या सर्वांमध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग किती असतो? आपण नुसतेच System वर टीका करणार का ती बदलण्यासाठी / चांगली होण्यासाठी स्वतः काही प्रयत्न करणार हा कळीचा मुद्दा आहे.

विशेषतः समाजामध्ये ज्यांना काही स्थान आहे, ज्यांनी काही नाव कमावलेले आहे अशा व्यक्तींकडून तर अशा सकारात्मक सहभागाची अथवा त्याच्या सकारात्मक प्रसिद्धीची अपेक्षा आहे.

“विवेकाचा जागर” या नावाखाली समाजातील वाईट प्रवृत्तींविरुद्ध लढा देणारे उत्सवाच्या या सकारात्मक बाजू तेवढ्याच जोमाने का मांडत नाहीत? का फक्त एकाच धर्माच्या वाईट बाजू सतत समाजासमोर मांडायच्या आणि कुठल्या तरी चमत्कारांनी “संत” पद देण्याच्या पद्धतीला मात्र जराही विरोध करायचा नाही – यातला “विवेकवादी” दुटप्पीपणा कोण उघडकीस आणणार?

आम्ही शिकले-सवरलेले लोक निदान एवढे तरी करू शकतो का? आपल्या प्रत्येक सणामागे जशी परंपरा आहे, जशी सामाजिक कारणे आहेत, तसेच विज्ञानही दडलेले आहे. मग दिवाळीला अमुक एक पदार्थच का खायचे, संक्रांतीला तिळगुळ का वाटतात, होळी/रंगपंचमी ही नेहमी उन्हाळ्याच्या आधीच का साजरी करतात किंवा आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंतचा चातुर्मास का पाळावा या सर्वांमागचे विज्ञान समजून घेण्याची कास आपण कधी धरणार? हे सर्व पुढच्या पिढीला कधी समजून सांगणार? का नुसतेच जुने ते सर्व प्रतिगामी म्हणत दुटप्पी पुरोगाम्याची री ओढणार?

आमचे एक स्नेही श्री. उदयन इंदुरकर गेल्या काही वर्षांपासून “एक होतं देऊळ” नावाचा कार्यक्रम सादर करतात. हा कार्यक्रम कुठल्याही धार्मिक आधारांवर नाही तर पूर्णतः शास्त्रीय दृष्टीकोनातून सादर होतो. पुरातन देऊळ कसे बांधले गेले त्यामागचे स्थापत्यशास्त्र काय होते, मूर्ती ठराविक पद्धतीने घडवण्यामागील त्यावेळच्या स्थापत्यशास्त्री व शिल्पकारांचा काय विचार होता इ. सर्व विषयांची शास्त्रीय पद्धतीने मांडणी श्री. इंदुरकर करतात. सर्व सुशिक्षित नागरिकांनी हा कार्यक्रम जरूर पहावा व जमले तर आपल्या प्राचीन संस्कृतीचा योग्य तो अभिमान बाळगावा व इतरांसही सांगावा.

तेंव्हा मित्रांनो कृपया विचार करा, झोपेतून जागे व्हा आणि करते व्हा, नुसते नाक मुरडणे नको. काहीतरी भरीव कार्य आपापल्या सोयीनुसार करा पण जरूर करा. गेली ७० वर्षे झोपलेला निद्रिस्त समाज, गेले २० वर्षे स्वतःतच मग्न झालेला समाज, आपल्या आणि कुटुंबाच्या पलीकडे न बघणारा समाज जर जागा आणि कर्ता झाला तर परिवर्तनाची फळे दिसायला वेळ लागणार नाही.

उपनिषदातला एक श्लोक जो स्वामी विवेकांदांनी लोकप्रिय केला त्याची यानिमित्ताने आठवण होते आहे. तो श्लोक असा आहे :

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधतक्षुरासन्न धारा निशिता दुरत्यद्दुर्गम पथ: तत् कवयो वदन्ति |

अर्थात

Arise! Awake! Approach the great and learn.

Like the sharp edge of a razor is that path, so the wise say−hard to tread and difficult to cross.

8 comments:

  1. Great thoughts Dhananjay, Hopefully this will provoke chain of thinking. Wish you happy ganesh ustav.

    ReplyDelete
  2. What is bad about Ganesh festival

    Traffic Jams
    Noise pollution
    Extortion
    Hot bed for breeding goondas and crooked politicians
    Digging the roads
    Millions of people making the public places a garbage dump.

    What is good about Ganesh Fest?
    All of the above..

    This is my balanced view....;-)

    ReplyDelete
  3. What is bad about Ganesh festival

    Traffic Jams
    Noise pollution
    Extortion
    Hot bed for breeding goondas and crooked politicians
    Digging the roads
    Millions of people making the public places a garbage dump.

    What is good about Ganesh Fest?
    All of the above..

    This is my balanced view....;-)

    ReplyDelete
  4. Dhananjay..... 'ek hote deool' type initiatives are requires which explain all our traditions from scientific viewpoint. This is totally lacking and hence people just follow things blindly leading to aberrations in celebrations.

    ReplyDelete
  5. Nice article Dhananjay,Mahashtra times "Samvad" on sunday has nice response from Lokamanya Tilak on some of the typical criticism at that point of time. Many folks have move forward with life and Ganesh Utsav in positive manner but there are folks who wear particular glasses and do selective criticism those were there in 1890's and still now 2016. By the way I have seen Ek Hota deul got inspired and went to Ajantha , Verul with family

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अमित. "संवाद" पुरवणी या आठवड्यात वाचेन. मग जमले तर बोलू.

      Delete
  6. धनंजय,

    बाप्पांच्या आगमनाच्या निमित्ताने लिहिलेला तुझा लेख वाचला. नेहमीप्रमाणेच उत्तम जमला आहे.

    गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर काल ठिकठिकाणी बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाली असणार. बाप्पांना आपल्या घरी अत्यंत उत्साहाने वाजतगाजत घेऊन येणारी कुटुंबं जशी आहेत तशीच अनेक मंडळंही आहेत. सार्वजनिकरीत्या जिथे गणपती बसवले जातात तिथे आता "अनंत चतुर्दशी"च्या दणदणाटाची "रिहर्सल" म्हणून गणेश चतुर्थीलादेखील अनेक तास चालणाऱ्या ढोल-ताशे मंडळांच्या मिरवणुका कालपासून आमच्या घरावरून सतत जात आहेत. नेमस्तपणे आणि संयमाचा तसेच विचारीपणाचा आव आणून बरीच मंडळी हाही त्रास मुकाट्याने सहन करीत असतील. उत्सवातील उत्साह आणि सार्वजनिक जीवनातील अशा उत्सवांची उपयुक्तता निर्विवाद असली तरीही काळ बदलला तशी यांत सकारात्मक असे बदल जर घडले असतीलच तर ध्वनी प्रदूषण आणि डोकी फिरवून टाकणाऱ्या अनंत अडचणी यांनी त्यांवर मात केलेली दिसते. हे असले उत्सव आता बंद करून टाका असं म्हणणे म्हणजे निव्वळ आततायीपणा आहे असं मला वाटतं. २०१६ मध्ये आपण आलो आहोत, आणि मुंबई-पुणे किंवा तत्सम मोठ्या शहरांपलीकडेही जग आहे हे वास्तव सोयीप्रमाणे नजरेआड करणाऱ्या जनतेला शहाणं होण्याची गरज आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप वगैरेंच्या आहारी जात चाललेल्या "सुजाण" लोकांना पुन्हा माणसांत आणणे गरजेचे आहे आणि सार्वजनिक उत्सव हा त्यासाठी एक चांगला पर्याय आहे असं मला वाटतं. तथापि, अशा उत्सवांत शिरलेल्या काही वाईट प्रवृत्ती केवळ नेमस्तांच्या "पार्टिसिपेशन" न करण्यामुळे उच्छादी झालेल्या आहेत. हातात सतत मोबाईल फोन किंवा तत्सम उपकरणे वापरून फक्त मनोरंजनात रमत राहणारी जनता वाढत आहे. समाजातील सर्व घटकांशी संवाद साधण्याची आणि समाजात चांगले बदल घडवून आणण्यासाठी स्वतःहून काही प्रयत्न करू इच्छिणारी आणि तशी गरज वाटणारी खरोखरीची सुजाण जनता अजूनही अल्पसंख्यच आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे विवेकी विचारक्षमतेवर काही परिणाम होत आहे की काय असं वाटायला लावणारी परिस्थिती सध्या आहे. बातम्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविताना हृदयाचा थरकाप उडवील असे संगीत वाजविणे, निर्लज्जपणे प्रचंड आरडाओरडा करीत ठराविक "अजेंडा" आखूनच चर्चा घडवून आणणे, निर्बुद्धपणे आणि बिनडोकपणे जागोजागीच्या बातम्या पोहोचविणारे आणि अजिबात संवाद-कौशल्य नसलेले तसेच कोणताही पाचपोच नसलेले अत्यंत येडचॅप बातमीदार, भाषा विषयाचा कोणताही गंध नसलेले अगाध मराठीत टंकन करणारी पाट्याटाकू जनता ..... असा सगळा आनंदीआनंद आहे. तारतम्याने जगू पाहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला तीव्र डिप्रेशनमध्ये ढकलेल अशी जरी परिस्थिती सभोवताली असली तरीही आपल्याला सर्वांना यांतूनच मार्ग काढायचा आहे आणि आपल्याबरोबरच इतरांचेही जीवन सुकर करायचे आहे. तू ज्यांचा उल्लेख केलास त्या संस्था खरोखरीच उत्तम काम करताना दिसतात आणि म्हणूनच माणुसकीवरील विश्वास अजूनही उडून जात नाही. पण ह्यासाठी "सर्वसामान्य" जनतेच्या विचारांमध्ये खरोखरीचे परिवर्तन घडविणे अत्यंत महत्त्वाचे आहे - यांत शिक्षणाचा फार मोठा सहभाग असणार आहे. भूतकाळात घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊन, विवेकवादावर आधारित जीवनशैली अंगीकारण्यासाठी आपण सर्वांनीच विविध प्रकारे पण मनःपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.

    ReplyDelete
  7. Well scripted Dhananjay
    One thing for sure, it gives a big boost for rolling the economy...

    ReplyDelete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.